मुंबई विद्यापीठातील सर्व परीक्षांचे निकाल ३१ जूलै रोजी लावा, या राज्यपालांनी दिलेल्या आदेशाची मुदत संपत आहे. एकंदर पेपर तपासणीमध्ये झालेल्या घोळ पाहता निकाल लावणे शक्य झाले नाही .
मुंबई – मुंबई विद्यापीठातील सर्व परीक्षांचे निकाल ३१ जूलै रोजी लावा, या राज्यपालांनी दिलेल्या आदेशाची मुदत संपत आहे. एकंदर पेपर तपासणीमध्ये झालेल्या घोळ पाहता निकाल लावणे शक्य झाले नाही तर राज्यपाल कुलगुरूंचा निकाल लावणार का, अशी चर्चा धास्तावलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठातल्या निकालाचा घोळ आणखी वाढला असून कुलगुरुंनी बोलावलेल्या ४ बैठकांपैकी ३ बैठकांना सिनेटची परवानी न मिळाल्यामुळे त्या रद्द झाल्या आहेत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निकाल लागले नाहीत तर त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिला आहे.
मुंबई विद्यापीठाचा निकालाच्या घोळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यात अखेर राज्यपालांनी कुलगुरूंना ३१ जूलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत निकाल लावण्याचे आदेश दिले होते. त्याचीही मुदत आज संपत आहे. या विषयावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहा विरोधकही आक्रमक झाले होते. तेथे उत्तर देतानाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ३१ जुलैपर्यंत निकाल लावले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र ते वचन पाळणे अवघड असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल लावणे विद्यापीठाला शक्य झाले नाही तर सर्व प्रकाराला जबाबदार असणा-या कुलगुरूंचा तरी निकाल लागणार का, असा सवाल विद्यार्थी विचारित आहेत. दरम्यान रविवार असला तरीही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी अकॅडमीक काऊन्सिल, मॅनेजमेंट काऊन्सिल, प्रॉस्पेक्टिव्ह प्लान आणि सिनेटची बैठक बोलवली होती. त्यापैकी मॅनेजमेंट काऊन्सिल, सिनेट आणि अकॅडमीक काऊन्सिलच्या बैठका रद्द करण्यात आल्या.
दरम्यान मुंबई विद्यापीठाचे निकाल लागण्याची डेडलाईन संपायला आता काही तास उरले आहेत, मात्र शिक्षणमंत्र्याच्या आश्वासनानुसार उद्या निकाल लागतील असे चित्र दिसत नाही. विद्यापीठाच्या ३ लाख उत्तरपत्रिका तपासणे अद्याप बाकी आहे. यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडेंची धावपळ सुरू झाली आहे. दुसरीकडे विनोद तावडेंविरोधात आता शिवसेना मैदानात उतरली आहे. आश्वासनाप्रमाणे निकाल न लागल्यास तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू असा इशारा शिवसेना आमदार अनिल परबांनी दिला आहे.