मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमधील पाणीसाठयात चांगल्याप्रकारे वाढ होताना दिसत आहे. वर्षभराला लागणा-या पाण्याच्या तुलनेत पन्नास टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमधील पाणीसाठयात चांगल्याप्रकारे वाढ होताना दिसत आहे. वर्षभराला लागणा-या पाण्याच्या तुलनेत पन्नास टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
तलावातील या पाणीसाठयामुळे महापालिका प्रशासन समाधान व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, मागील दोन वर्षामधील पाणीसाठयाची आकडीवारी पाहता सध्या ६६,६२७ कोटी लिटर जमा झालेला पाणीसाठा विक्रमी मानला जात आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा आदी धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. यापैकी भातसा धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार या सर्व धरणांमध्ये ६६,६२७ कोटी लिटर पाणीसाठा जमा झाला होता.
२०१५ मध्ये या धरणांमध्ये या कालावधीत २८६९७ कोटी लिटर व २०१४ मध्ये २० हजार कोटी लिटर पाणीसाठा होता. २०१३मध्ये या कालावधीत ८८ हजार कोटी लिटर पाणीसाठा होता. त्यामुळे २०१३ नंतरच पहिल्याच दीड महिन्यात निम्मा पाणीसाठा जमा झाल्याची आकडेवारी समोर येत आहे.
तलावातील पाणीसाठयात याच वेगाने वाढ होत राहिल्यास आणि सप्टेंबपर्यंत चांगल्याप्रकारे पाऊस पडल्यास मुंबईकरांना आवश्यक पाणीसाठा जमा होईल. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी वर्षासाठी १ लाख ४० हजार कोटी लिटर पाण्याची गरज आहे. त्या तुलनेत सध्या ६६ हजार ६२७ कोटी लिटर पाणीसाठा जमा झाल्यामुळे या पाणीसाठयात वाढ होऊन मुंबईकरांची तहान चांगल्याप्रकारे भागवता येईल, असा विश्वास जलअभियंता विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येतो.