जिल्हा मध्यवर्ती बँकांमधून हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारण्यावर रिझव्र्ह बँकेने बंदी घातली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे.
मुंबई- जिल्हा मध्यवर्ती बँकांमधून हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारण्यावर रिझव्र्ह बँकेने बंदी घातली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. मध्यवर्ती बँकांना नोटा बदलीची परवानगी नाकारून सरकारने शेतक-यांची कोंडी केली आहे.
सरकारी बँकांप्रमाणे जिल्हा बँकांना केंद्र सरकारने समान वागणूक दिली पाहिजे. जर सरकारचा या बँकांवर विश्वास नसेल तर एक वेळ मंत्रालय बंद करून तेथील बाबू लोक जिल्हा बँकेत बसवा व नोटा बदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी करा. मात्र शेतकरी जनतेला त्रास देऊ नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा बँकांना सरकारने नोटा बदलण्याची परवानगी दिल्यास शेतकरी व ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळाला असता. परंतु सरकारने जिल्हा बँका व सहकारी बँकांवर अविश्वास दाखवून शेतक-यांच्या अडचणीत वाढ केली आहे. सरकारी बँकांप्रमाणे जिल्हा बँका व सहकारी बँकांनाही केंद्र सरकारने समान वागणूक दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारकडून रोज तुघलकी निर्णय घेतले जात आहेत. बोटाला शाई लावणे, पैसे काढण्याची मर्यादा ४५०० वरून पुन्हा २००० वर आणणे अशा प्रकारचे नवनवे निर्णय लोकांवर लादले जात आहेत.
भाजपा सरकार शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी अनुकूल नाही. मात्र उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ केली जात आहेत. यावरूनच सरकार शेतकरीविरोधी आणि उद्योगपतींच्या बाजूचे असल्याचे दिसून येते, अशी टीकाही मलिक यांनी केली.
कोल्डप्लेविरोधात राष्ट्रवादीचा ‘हॉट प्ले बँड’
‘गरिबी हटाओ’च्या नावाखाली भाजपा खासदार पूनम महाजन यांच्याद्वारे ब्रिटनच्या ‘कोल्ड प्ले बँडचे’ आयोजन करण्यात आले आहे. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, ‘सरकारने ‘कोल्ड प्ले बँडला’ विविध करात सूट दिली आहे. या कार्यक्रमात दारू पिण्याची संमती दिली आहे. तसेच या कार्यक्रमाच्या तिकिटाचे दर महाग आहेत. त्याचा लाभ गरीब जनतेला मिळणार नाही.
त्यामुळे या ‘कोल्ड प्ले बँड’ कार्यक्रमाविरोधात मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मुंबईत ‘हॉट प्ले बँड’ विनामूल्य वाजवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पूर्णपणे दारूबंदी असणार आहे. गरिबांना त्याचा आनंद घेता यावा, यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील सहा रस्त्यांवर ‘हॉट प्ले बँड’ वाजवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.