मुंबईच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई- मुंबईच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशांनुसार या मैदानावरील काही मोजक्या भागातच नाताळ आणि नववर्ष साजरे करता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. शांतता क्षेत्र असल्यामुळे शिवाजी पार्कवर लाऊड स्पीकरचा वापर करण्यास बंदी आहे.
तसेच या ठिकाणी कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी आहे. याविरोधात शिवाजी पार्क जिमखान्याने सर्वोच्च न्यायालयात नाताळ आणि नववर्षाच्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.
मात्र, या कार्यक्रमाच्या वेळी या ठिकाणी आखून देण्यात आलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शिवाजी पार्क मैदान परिसरातील शिवाजी पार्क जिमखाना क्लब इमारतीच्या क्षेत्रावरच हा कार्यक्रम साजरा करता येणार आहे. त्यासाठी जिमखाना परिसरात तात्पुरता मंडप उभारता येईल.
मात्र कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर हा मंडप तात्काळ काढून टाकण्यात यावा, असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने या आदेशाची राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि वेकॉम या स्थानिक रहिवाशांची संघटनेला नोटीस पाठविली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने सार्वजनिक कार्यक्रमांच्या आडून शिवाजी पार्क मैदानावर अतिक्रमण केले जात असल्याविरोधातही कठोर भूमिका घेतली होती.
शिवाजी पार्क हे कुणा राजकीय पक्ष तसेच संस्थांची जहागिरी नाही, तर त्यावर केवळ लोकांचा आणि मुंबईकरांचा अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट बजावले होते. तसेच शिवाजी पार्कवर होणा-या सभा आणि कार्यक्रमांसाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे आदेश देऊन पुढील वर्षापासून ते संबंधित कार्यक्रमांपासून मुक्त राहील, याची खबरदारी घेण्याचेही न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले होते.