सुब्रमण्यम स्वामी हे या देशाच्या राजकारणातील जोकर आहेत. अर्थात जोकर म्हणणे हा त्या जोकर म्हणजे विदूषकाचा अपमानच आहे.
लोकांना हसवणारा सर्कशीतील विदूषक हा उत्तम कलावंत असतो. परंतु समोरच्या प्रेक्षकांना हसवण्याकरिता तो झुल्यावरून पडतो, मोटारसायकलवरून आडवा झोपून खाली पडतो, त्याचा लेंगा समोरच्या कलावंताच्या हातात येऊन जातो, अशा खूप गंमतीजमती करणारा विदूषक सर्कशीत लहान मुलांना पसंत असतो. पण तोच अस्सल कलावंत असतो. त्यामुळे राजकारणातील सुब्रमण्यम स्वामी यांना विदूषक म्हणणे योग्य नव्हे. पण ज्यांना ‘न्यूसन्स व्हॅल्यू’ म्हणजे उपद्रव मूल्य म्हणतात ते उपद्रव मूल्य स्वामी यांच्याजवळ आहे. देशाचे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा एका उपद्रव मूल्याच्या शोधात होते. सुब्रमण्यम स्वामींच्या रूपाने त्यांना हे कार्टून मिळाले.
भाजपाजवळ सध्या एकच कार्यक्रम आहे. तो म्हणजे काँग्रेसला बदनाम करण्याचा. जिथपर्यंत काँग्रेसवर हल्ला होत नाही तिथपर्यंत भावनात्मक विषयाला हात घालून लोकांची माथी खराब करता येणार नाहीत, असा याचा हिशेब आहे. श्रीमती प्रियंका गांधी राजकारणात येऊ नयेत म्हणून त्यांच्या पतीचे प्रकरण उभे करायचे.. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना राजकीयदृष्टय़ा थेट बदनाम करायचे. यासाठी मोदींना एका माणसाची गरज होती. सध्याच्या भाजपामधील मंत्रिमंडळात किंवा खासदारांमध्ये जे हवे ते बोलायची तयारी ठेवणारा कोणी नव्हता. कारण त्याच्याकरिता जी उपद्रव मूल्याची भूमिका घ्यावी लागेल, ती घ्यायला कोणी तयार नव्हते.
सुब्रमण्यम स्वामींना हाताशी धरायचे तर त्यांना कोणते तरी पद द्यायला हवे. १९७७ च्या जनता पक्षाच्या काळात मोदी लहान असतील. २०-२२ वर्षाचे असतील. त्या जनता पक्षालाही या सुब्रमण्यम स्वामींनीही ‘भीक नको पण कुत्रा आवर’, अशी वेळ आणली होती. परिणामी जनता पक्षातून स्वामींना काढावे लागले. मूळचा हा जनसंघाचा माणूस. म्हटलं तर बुद्धिमान. पण ही बुद्धी सरळ चालत नाही. तिरकी चालते. वाकडे तेच बघते. त्या सुब्रमण्यम स्वामींना कोणते तरी पद दिल्याशिवाय त्यांना काँग्रेसच्या अंगावर सोडता येणार नाही, त्यामुळे स्वामींना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवण्याचा निर्णय मोदी महाराजांना घ्यावा लागला.
राज्यसभेत पोहोचल्या, पोहोचल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी चुणूक दाखवायला सुरुवात केली. जिथपर्यंत ते काँग्रेसवर घसरत होते तिथपर्यंत भाजपाला, भाजपा सरकारला, पंतप्रधान मोदींना खूप हायसे वाटत होते. परिणामी सुब्रमण्यम स्वामींवर मोदी खूष होते. एवढे खूष होते की, स्वामींना खासदार करण्याचा निर्णय राजकीयदृष्टय़ा किती अचूक ठरला आहे, अशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये चर्चाही झाली. अर्थात ही चहा पिताना झालेली चर्चा होती. पण स्वामींचा दुसरा नाटय़प्रवेश मोदींना समजलेला नव्हता.
आता जेव्हा स्वामींनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरच हल्ला चढवला आणि त्यांच्या देशभक्तीवरही शंका घेतली. मोदींचे दुसरे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या तिघांनाही सुब्रमण्यम स्वामी यांनी झोडपायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा स्वामींचे लोढणे कशाला गळय़ात बांधून घेतले, अशी मोदींची अवस्था झाली. जेव्हा वाह्यात बोलणा-यांची स्पर्धा असते तेव्हा विविध वाहिन्यावाल्यांना त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी अशा भंपक आणि आचरट लोकांची गरज असते. सुब्रमण्यम स्वामी यांनी काही बरळावे आणि चॅनेलवाल्यांनी काही दाखवावे.
चॅनलवालेही लोकांना मूर्ख समजतात आणि आपला टीआरपी वाढवतात. पण स्वामी यांच्या विषयात त्यांना खासदार बनवण्यात किती मूर्खपणा झाला हे आता देशाच्या पंतप्रधानांना कळले आहे. आता मोदींनी पुढाकार घेऊन रघुराम राजन यांना देशभक्तीचे पत्र देऊन टाकले आहे. या देशाचा प्रत्येक नागरिक जो मूलत:च देशभक्त आहे तो लहान पदावर असेल किंवा मोठय़ा पदावर असेल, त्याच्या देशभक्तीला कोणताही तराजू लावता येणार नाही. त्यामुळे सामान्य माणसाचीच देशभक्ती निर्विवाद आहे. स्वामींसारखी भंपक माणसे नको त्या विषयाला हात घालतात.
चॅनलवाले त्याला महत्त्व देतात आणि आपण फार मोठे आहेत, असे मग स्वामींसारख्या भंपक माणसांना वाटू लागते आहे. आता देशाच्या पंतप्रधानांना रघुराम राजन यांना देशभक्तीचे सर्टिफिकेट देण्याकरिता पुढे यावे लागले. खुलासा करावा लागला. या देशाच्या कोणत्याही नागरिकाला ही स्थिती अत्यंत अपमानकारक आहे. ‘अ’ माणसाच्या देशभक्तीबद्दल ‘ब’ माणसाने प्रमाणपत्र द्यावे, हीच मुळी अतिशय संतापजनक बाब आहे. मोदी यांनी या देशातील कुणालाही असे सर्टिफिकेट देण्याचा कारखाना काढू नये. मुळात पंतप्रधानांना तो अधिकार नाही. कुणालाच तो नाही. देशाच्या नागरिकांना देशभक्तीत तोलणारे पंतप्रधान कोण? स्वामी काही बोलले म्हणून त्याचा खुलासा करून प्रमाणपत्र देण्याची भूमिका घेतली तर स्वामींचे महत्त्व वाढते. दारू प्यायलेला माणूस नशेत काहीही बोलतो. तो नशेचा परिणाम असतो. स्वामींना खासदार करून पंतप्रधानांनी चूक केली त्याची फळे आता त्यांनाच भोगावी लागत आहेत.
यानिमित्ताने आणखी एक गोष्ट पंतप्रधानांनी स्पष्ट केली. ‘व्यवस्थेपेक्षा कोणीही स्वत:ला मोठे समजू नये’ मोदींचे हे वाक्य प्रत्येक व्यवस्थेचा सन्मान करणारे आहे. स्वामी स्वत:ला अतिशय शहाणे समजू लागले होते. अर्थमंत्र्यांना तुच्छ मानत होते. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना तुच्छ मानत होते. खासदार झाल्यामुळे आपले हात आकाशाला पोहोचले, अशा थाटात ते वावरत होते. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. मोदींनी नेमक्या शब्दांत स्वामींना त्यांची जागा दाखवली.
राज्यसभेचा खासदार म्हणजे असा कोण लागून गेला की, त्याने कोणाच्याही देशभक्तीबद्दल शंका घ्यावी. त्यामुळे या देशातील लोकशाहीच्या सर्व व्यवस्था या उत्तम आहेत. त्यापेक्षा कोणी मोठे नाही. ही मोदींची भूमिका लोकशाही व्यवस्थेला बळ देणारी आहे, यात काही वाद नाही. पण मोदींनी नकळत जे सत्य सांगितलेले आहे. त्या सत्याच्या मागे आणखी एक पूर्णसत्य दडलेले आहे. ते पूर्णसत्य असे आहे की, मोदींनी उच्चारलेले वाक्य मोदींनाच लागू पडते! लोकशाही व्यवस्थेत पंतप्रधान हा सर्वोच्च आहे. हे सगळे मान्य केल्यावरही तो लोकशाहीतला पंतप्रधान आहे.
राजेशाहीतील पंतप्रधान नाही, हे पहिल्याप्रथम या देशात कोणी समजून घ्यायची गरज असेल तर ते नरेंद्र दामोदरदास मोदी यांनाच त्याची गरज आहे. गेली दोन वर्षे म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून मोदी स्वामींपेक्षा हवेत आहेत. या देशात ‘मोदी आणि मोदी’ हे दोनच शब्द चलनी नाणे झालेले आहे. प्रज्ञावंतांना किंमत नाही. विचारवंतांची गरज नाही. देशाचा पंतप्रधान देशात न राहता जगभर फिरतो आहे. भारताची बदनामी करत फिरत आहे. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. व्यवस्थेपेक्षा आपण कोणीतरी मोठे आहोत, असे वाटल्याखेरीज परदेशात मोदींनी भारताला भ्रष्ट ठरवले नसते. या देशाचे जे काही उणेपण असेल त्याची चर्चा याच देशात व्हायला पाहिजे आणि ते उणेपण दुरुस्त व्हायला पाहिजे.
परदेशात जाऊन ‘आमचा देश भ्रष्ट आहे’, असे या देशाच्या पंतप्रधानांनी सांगणे म्हणजे या देशाचा पंतप्रधान व्यवस्थेपेक्षा कोणीतरी मोठा आहे, असे मानण्यासारखे आहे. म्हणून स्वामींसाठी जे वाक्य मोदींनी उच्चारले ते पहिल्याप्रथम मोदींनाच लागू पडत आहे. भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांना मोदी किंमत देत नाहीत. जेवढय़ा देशांत मोदी पंतप्रधान म्हणून फिरले. पण या देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांना कसलीही किंमत राहिलेली नाही. संरक्षणमंत्र्यांनाही किंमत नाही. अर्थमंत्री पंतप्रधानांच्या मागे मांजरासारखे फिरत आहेत. अशी अवस्था या देशात कधीही नव्हती. म्हणून स्वामी यांना सुनावण्यासाठी उच्चारलेले वाक्य मोदींनाच इतके फिट्ट लागू होत आहे की, मोदींनी ते आधी अमलात आणावे आणि मग लोकांना उपदेश करावेत.