नव्या वेळापत्रकानुसार शनिवार आणि रविवारच्या काही गाडय़ा रद्द केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने करताच नायगाव स्टेशनवर प्रवाशांनी आक्रमक पवित्र घेत रेलरोको केला.
नालासोपारा / वसई- नव्या वेळापत्रकानुसार शनिवार आणि रविवारच्या काही गाडय़ा रद्द केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने करताच नायगाव स्टेशनवर प्रवाशांनी आक्रमक पवित्र घेत रेलरोको केला. त्यामुळे चर्चगेटकडे जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. नायगाव रेल्वे स्टेशनवरील रेलरोकोमुळे पश्चिम रेल्वे मार्गाच्या लोकलच्या ६० फे-या रद्द करव्या लागल्या आहेत. मात्र, तासाभराच्या खोळंब्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यास रेल्वे प्रशासनास यश आले. परंतु, लोकल विरारवरुन भरुन येते. त्यामुळे नायगाव स्टेशनला प्रवाशांना चढता येत नाही. त्याचा राग लोकांनी दारात असलेल्या एका प्रवाशावर काढला.
२ रेल्वे गाडय़ा अचानक रद्द केल्याची माहिती प्रवाशांना मिळाल्यामुळे विरार, नालासोपारा, वसई, नायगाव या स्थानकावर मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली. मुंबईकरांना कामावर पोहोचायला उशीर होत होता. अन्य गाडय़ा तुडुंब भरून जात असल्याने नालासोपारा व नायगाव स्टेशनवर प्रवाशांना आत शिरणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे मारहाणीच्या घटनाही घडल्या. यावेळी कुणीही पोलीस कर्मचारी फलाटावर नसल्याचे प्रवाशी हितेश गायकवाड यांनी सांगितले. जीआरपी पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, आरपीएफचे प्रभारी सुरेंद्र कुमार, स्थानिक शहर पोलीस, स्थानिक नगरसेवक, काही प्रवाशांनी यावेळी आंदोलकांना शांत केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ प्रमाणे आंदोलकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली.
[EPSB]
कोकणात साहित्य संपदा आहे, मग आर्थिक का नाही?
[/EPSB]