मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा कायापालट करण्याचा सरकारचा विचार आहे.
मुंबई- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा कायापालट करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईतील पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जाणार असून विविध योजना राबवल्या जाणार आहेत.
यात मुंबई रेल्वेसाठी ४० हजार कोटींचे प्रकल्प असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. रविवारी वांद्रे टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल येथून गोरखपूर येथे रवाना होणा-या तीन गाडयांना रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते हिरवा कंदिल दाखवण्यात आला.
याप्रसंगी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील विविध सोयी-सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी प्रभू बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रभू यांनी वांद्रा टर्मिनस ते गोरखपूर या मार्गावरील नव्या एक्सप्रेस रेल्वे गाडीचे उद्घाटन केल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकातील पयिचम रेल्वेतील फलाट क्रमांक ७ व दिवा स्थानकातील जलद लोकलसेवेचे उद्घाटन केले. याशिवाय, कुर्ला, मानखुर्द, बोरीवली, अंधेरी, वाशी, बेलापूर, सीएसटी, भायखळा व पनवेल स्थानकात वाय-फाय सुरू करत असल्याचेही प्रभू यांनी जाहीर केले.
१२ उपनगरीय रेल्वे गाडयांना १२ डब्ब्यांवरून थेट १५ डब्बे करण्याचीही घोषणा त्यांनी केली असून ४० हजार कोटींतून होणा-या सर्व प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले. यामुळे मुंबईतील रेल्वेचा ख-या अर्थाने विकास होणार आहे.
सध्या सर्व व्यवहार कॅशलेस करण्यासंदर्भात माहिती देताना प्रभू म्हणाले की, रेल्वे तिकिट कॅशलेस करण्यासाठी प्रत्येक स्थानकात पीओएस मशिन, ‘आर’ वॉलेट, मोबाईल तिकीटसेवा सुरू करण्यात येत आहे. तसेच ज्या प्रवाशांकडे स्मार्ट फोन नाहीत, त्यांना कॅशलेस तिकीटांचा पर्याय देण्यात आला आहे. मुंबईसह देशभरातील स्थानकांत ही सुविधा मोठया प्रमाणात राबवली जाईल, असे प्रभू यांनी म्हटले आहे.