लोकांमधून निवडून न येताही प्रमुख मंत्रीपदावर कब्जा मिळवून बसलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवरील ग्रामीण धडाडीच्या शिवसेना आमदारांचा आक्रोश अखेर ‘मातोश्री’च्या भिंतीपर्यंत पोहोचला आहे.
मुंबई- लोकांमधून निवडून न येताही प्रमुख मंत्रीपदावर कब्जा मिळवून बसलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवरील ग्रामीण धडाडीच्या शिवसेना आमदारांचा आक्रोश अखेर ‘मातोश्री’च्या भिंतीपर्यंत पोहोचला आहे.
ज्येष्ठांना डच्चून देऊन त्यांच्या जागी तरुण रक्ताच्या धडाडीच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ज्येष्ठांना न दुखाविता त्यांच्यावर पक्ष वाढीची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते. याबाबत मंत्री आणि आमदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार आहे.
ग्रामीण भागात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी बळकट व्हायची असेल तर तिकडच्या आमदारांना शक्ती दिली पाहिजे, हे आमदारांचे म्हणणे आता ‘मातोश्री’ला पटले आहे. म्हणूनच लोकांतून निवडून न येता ज्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्री पदे आडवून ठेवली आहेत, त्यांना पक्ष बांधणीच्या कामासाठी म्हणून मंत्री पदातून मोकळे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ज्येष्ठ मंत्र्यांना आता डच्चू मिळणे जवळपास निश्चित झाले.
पक्षबांधणीसाठी मोकळे करण्यात येणा-या मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री दीपक सावंत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा समावेश असल्याचे समजते. गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना आमदारांची नाराजी भोवण्याची चिन्हं आहेत, तर आक्रमक असलेल्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
येत्या काळात शिवसेनेच्या अजेंडय़ांवर ‘मिशन विदर्भ’ असल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल राज्यमंत्री संजय राठोड यांना बढती मिळू शकते.
राज्यमंत्र्यांमधील संजय राठोड, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. तर राज्यमंत्री म्हणून कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, निफाडचे अनिल कदम, पारनेर चे(अहमदनगर)- विजय औटी आणि पाटणचे शंभूराजे देसाई यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.