एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारणा-या शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी विमानातून प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे.
नवी दिल्ली- एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारणा-या शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांना भारतीय विमान कंपन्यांनी आपल्या विमानातून प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. त्यांना ‘नो फ्लाय’ यादीत टाकण्याच्या या निर्णयाला टाटा समुहातील कंपन्यांनी पाठींबा दिला आहे.
या मारहाणीबद्दल रविंद्र गायकवाड यांनी साधी खंतही व्यक्त केली नाही. उलट आपण त्याला सँडलने २५ वेळा मारले, एवढेच नव्हे तर मी पुन्हा विमानाने जाऊन दाखविन, हिंमत असेल तर उतरवून दाखवा असे सांगितले.
उस्मानाबादाचे खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध मारहाण केल्याचा आणि विमान तब्बल ४० मिनिटे रोखून धरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी या प्रकाराबद्दल खा. गायकवाड यांच्यावर टीका केली.
खा. गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी बुधवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे ओपन तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या स्वीय सचिवाला दिल्याचे एअर इंडियाचे म्हणणो आहे.
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचा-यांशी वाद घातला. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचा-यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६० वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत चपलेने मारले.
खासदार गायकवाड यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी त्यांचे नाव काळ्या यादीत टाकले आहे.
‘मी कशाबद्दल माफी मागायची, ‘ असा प्रतिसवालही गायकवाड यांनी केला आहे. ‘त्या अधिका-यांनी माझ्याबरोबर गैरवर्तन केले आहे. त्यांनी आधी माझी माफी मागावी, मग बघू, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलतांना सांगितले. एअर इंडियाने माझ्याविरोधात कोणतीही कारवाई कारवाई करावी, मी दंड भरण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.
त्यामुळे जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाइस जेटचा समावेश असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एअर इंडियाने समिती नेमली आहे.