राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावून महापौरपद मिळविण्याची शिवसेनेची वाट बिकट ठरण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावून महापौरपद मिळविण्याची शिवसेनेची वाट बिकट ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खबरदारी म्हणून व्हीप जारी करण्याची शक्यता असून, व्हीप झुगारून नगरसेवकपद धोक्यात घालण्याची हिंमत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून दाखविण्याची शक्यता तूर्त कमी आहे. तर या फॉम्र्युल्यापुढे शिवसेनेचे फोडाफोडीचे राजकारण फिके पडणार असल्याने पुन्हा महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर विराजमान होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या १११ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५२ नगरसेवकांची फौज आहे. त्यात पाच अपक्ष व १० काँग्रेस नगरसेवकांच्या समर्थनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे बहुमत आहे. त्या तुलनेत शिवसेनेकडे ३८ व भाजपकडे ६ अशी युतीकडे ४४ नगरसेवकांची ताकद आहे.
काँग्रेसमधील एका नाराज नगरसेविकाच्या बळावर स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत करिष्मा घडवित शिवसेनेने सभापतिपद खेचून आणले होते. मात्र, या फॉम्र्युल्याच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करून कोटय़वधींची प्रलोभने देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या बडय़ा नेत्यांकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते; परंतु महापालिकेत उर्वरित अडीच वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सहजासहजी फोडाफोडीचे राजकरण करून देईल, असे चित्र दिसत नाही.
स्थायी समितीच्या निवडणुकीत तोंड भाजल्यानंतर आपले नगरसेवक फुटू नयेत, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्हीपची ढाल पुढे केली जाण्याची शक्यता अधिक आहे. हात वर करून होणा-या महापौरपदाच्या ऐन निवडणुकीत कोणी गैरहजर अथवा विरोधात मतदान करू नये, यासाठी व्हीप जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच विरोधात मतदान केल्यास अथवा गैरहजर राहिल्यास नगरसेवकांचे स्वत:चे पद धोक्यात येणार आहे. राजीनामा दिल्यास पुन्हा निवडणुकीत यश मिळेल, याची शंभर टक्के खात्रीही नाही.
त्याचबरोबर अपक्ष नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे गटस्थापना करताना राष्ट्रवादी काँग्रेससोबतच एकत्र गट स्थापन केल्याने त्यांचाही परतीचा मार्ग बंद झाला आहे. शिवाय नवी मुंबईतील शिवसेनेला नेता नसल्याने ऐरोलीतील नेत्याच्या नेतृत्वाखाली येऊन काम करण्यास अनेकांच्या पसंतीचे नसल्याचे समोर आले आहे.
[EPSB]
पक्षांतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती होईल, असे सांगत पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी येत्या महिन्याभरातच हा बदल होण्याचे संकेत शुक्रवारी दिले.
[/EPSB]