महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका ठेक्यातील वायरमनचा विजेचा शॉक लागून खांबावरून पडून जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नालासोपारा- महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका ठेक्यातील वायरमनचा विजेचा शॉक लागून खांबावरून पडून जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवनकुमार हा ठेक्यावर काम करत होता. मात्र, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे सुरक्षेचे साहित्य नव्हते. त्यामुळे कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर ठाकूर विद्यालयाजवळील विजेच्या एलटी पोलवर वायर तुटली होती. ती जोडण्यासाठी पवनकुमार लालताकुमार शर्मा (३६) चढला होता. ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा बंद केला होता आणि त्याच्या सोबत असलेला सी. भोईर हे गस्त घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी महावितरणचा कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. अचानक वीज पुरवठा झाल्याने तो क्षणार्धात खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान पवनकुमार लालता कुमार शर्मा याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सुहास लाखन यांनी पवनकुमार लालताकुमार शर्मा हा काम करीत असताना इन्व्हर्टरचा वीज प्रवाह उलट आल्याने शॉक लागला असून त्याची चौकशी केली जात असून मयत पवनकुमारच्या वारसांना तत्काळ वीस हजार रुपयांची मदत केल्याचे सांगितले. तर महावितरणचे कनिष्ठ अभियंता दिनेश चौधरी यांनी सांगितले की, नवरात्र उत्सवाचा जनरेटर सुरु होता. त्याचा वीज प्रवाह उलट आल्याने शॉक लागला. दोघांच्या भिन्न प्रतिक्रिया आल्याने या अपघाताबाबत नागरिकात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
[EPSB]
[/EPSB]