जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला असून; भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या सुरेश धस यांच्या रक्तातच विश्वासघात आहे.
मुंबई- जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला असून; भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या सुरेश धस यांच्या रक्तातच विश्वासघात आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
धस यांच्या विश्वासघातामुळेच बीड जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या हातातून गेली, असे मुंडे यांचे म्हणणे आहे. कमी जागा मिळालेल्या असताना भाजपाने बीड जिल्हा परिषदेवर शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली आहे. ३४ मतांसह भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला.
तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ २५ मते मिळाली आहेत. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या पाच सदस्यांनी मदत केली. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ वाढले; शिवाय भाजपाला शिवसंग्राम आणि शिवसेनेनेही मदत केली. परिणामी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या सविता गोल्हार यांची; तर जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगल प्रकाश सोळंके यांना २५ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचाही पराभव झाला आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा भाजपाला फायदा झाला आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादीत फूट?
बीड जिलचे नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिले जात जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिलत राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचे नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचे बोलले जाते. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. शिवाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीने बीड पंचायत समितीत संदीप क्षीरसागर यांच्या नावे व्हीप बजावून क्षीरसागर यांना घरातूनच आव्हान निर्माण केले होते. याचाच राग म्हणून भारतभूषण यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते.
सुरेश धस यांनी भाजपाला केलेल्या मदतीमुळेच राष्ट्रवादीची सत्ता बीड जिल्हा परिषदेत आलेली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. सुरेश धस हे विश्वासघातकी असल्याने त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. तर सुरेश धस यांनी मागच्या दाराने येणारे पक्षात डोईजड होऊ लागले आहेत.
ज्यांनी आपल्या रक्ताच्या लोकांसोबत विश्वासघात केला; त्यांनी आम्हाला ‘विश्वासघात’ या शब्दाबाबत सांगू नये, असा पलटवार मुंडे यांच्यावर केला आहे. या दोघांमधला हा वाद आता टिपेला गेल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही धस यांच्याविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत.
तुम्ही रक्ताच्या लोकांसोबत विश्वासघात केला त्याचे काय? – धस
ज्यांनी रक्ताच्या लोकांसोबत विश्वासघात केला; त्यांनी आम्हाला ‘विश्वासघात’ या शब्दाबद्दल सांगू नये. मी २१ तारखेपुरता भाजपासोबत होतो; मात्र मी पक्षाशी विश्वासघात केलेला नाही. पक्षात सध्या पुढच्या दारापेक्षा मागच्या दारातून येणा-यांची चलती आहे.
मुख्यमंत्री विधान परिषदेतील आमदार ठरवत नाहीत; ते विधानसभेतील आमदार ठरवतात, याचे भान मुंडे यांनी ठेवावे, अशी धस यांनी मुंडे यांची कानउघाडणी केली.
धस यांच्यावर कारवाईचे अजित पवार यांचे संकेत!
बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. पक्षाशी व मतदारांशी द्रोह करणा-यांवर पक्षनेतृत्व कठोर कारवाई करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली. बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या.
जिलतला पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी तळमळीने झटत असताना व त्याच्या परिश्रमावर लोकमान्यतेची मोहर उमटलेली असताना पक्ष उमेदवाराचा झालेला पराभव कार्यकर्ते व मतदारांच्या जिव्हारी लागला आहे.
या संदर्भात पक्षभावना अत्यंत तीव्र आहेत. पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रीपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणा-यांना धडा शिकवण्यात येईल. अशा पक्षविरोधी कारवाया मी कदापि सहन करणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.