टिटवाळा आणि आसपासच्या परिसरातील विविध शाळांमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्ता जनजागृती करण्यात आली.
कल्याण- टिटवाळा आणि आसपासच्या परिसरातील विविध शाळांमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्ता जनजागृती करण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी गणेश विद्यालय टिटवाळा येथे वन्यजीव सप्ताह निमित्ताने प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक पुराणिक सरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. पर्यावरण दक्षता मंडळाच्या संगीता जोशी यांनी आपल्या भाषणात जंगल आणि देवराई यांचे महत्त्व समजावून सांगितले तर सुभाष ईसामे यांनी भारतीय वृक्ष आणि त्यांचे महत्त्व मुलांना सांगितले.
वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रपाल वैभव वाळींबे यांनी वन्यजीव संवर्धन या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी गणेश विद्यालयाच्या सुमारे १६० विद्यार्थ्यांनी टिटवाळा मंदिर परिसरात वन्यजीव संरक्षणाचा नारा देत प्रभातफेरी काढली. ७ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळा अणे, येथील मुलांना पर्यावरणावर आधारित लघुपट दाखवून वन्य प्राण्यांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. जिल्हा परिषद शाळा कुंदे-मामणोली येथे इयत्ता १ ली ते ८ वी च्या २५० मुलांना देवराई – वनीकरण प्रकल्प समन्वयक तथा वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी ‘दोस्ती करूया सापांशी’ या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवून वन्य प्राण्यांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगत मूलांशी गप्पा मारत ‘वन्यजीव सप्ताह’ निमित्त देवराईचे महत्त्व सांगितले. यानंतर या मुलांनी संपूर्ण मामणोली गावात प्रभातफेरी काढत वन्यजीव संर्वधनाचा नारा दिला आणि वन्यजीव सप्ताह चा सांगता समारोप जिल्हा परिषद शाळा कुंदे-मामणोली येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी कल्याण विगागाचे वनपाल मुरलीधर जागकर, वैभव वाळींबे, शिवाजी घुढे, सिद्धिकी अब्बास शेख, कांचन मोकाशी, विजय वाकचौडे तसेच वनरक्षक श्रीकांत राऊत, संतोष रेवणे, रमेश जाधव, संतोष पालांडे, गणेश वाघ महिला वनरक्षक मनीषा पाटील व मोहिनी होलगीर, सर्पमित्र निखिल कांबळे यांनी योगदान दिले असे पर्यावरण दक्षता मंडळाचे सुहास पवार यांनी सांगितले.