अभिनेता उपेंद्र लिमये म्हणजे सामाजिक चित्रपटांत शोभणारा नट अशी प्रतिमा बनली आहे. उपेंद्रलाही ते मान्य आहे. तोही स्वत:ला चळवळीतला अभिनेता समजतो. ‘‘ज्या समाजात आपण जगतो किंवा ज्या समाजाने आपल्याला इतके काही दिले आहे. चांगल्या भूमिका करून समाजाचे पांग फेडण्याचा प्रयत्न करतो,’’ असे उपेंद्रचे म्हणणे आहे. समरसून भूमिका करून आपली वेगळी छाप पाडणा-या उपेंद्रची सामाजिक चित्रपटांसह त्यातील त्याच्या भूमिकांमागे त्याची स्वत:ची अशी काही मते आहेत. ती जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
सामाजिक भूमिका साकारणारा नट अशी प्रतिमा बनली आहे का?
होय! मला वाटते, हळूहळू तशी प्रतिमा बनली आहे. मी चळवळीतला अभिनेता आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर माझी जडणघडण प्रायोगिक रंगभूमीवर झाली आहे. इथे वेगवेगळे आणि वाटतील ते विषय तुमच्या पद्धतीने सादर करायचे असतात. माझी आठ-दहा वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर गेली. एक कलाकार म्हणून आपण ज्या समाजात राहतो किंवा ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्या समाजाविषयी असलेल्या गोष्टी साकारायला आवडतात.
‘मुक्ता’, ‘जोगवा’ चित्रपट असेल किंवा ‘मी सिंधुताई सपकाळ’ असेल किंवा ‘चांदनी बार’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ किंवा ‘यलो’ असेल. सिनेमामध्ये अनेक जॉनर आहेत. सामाजिक तसेच राजकीय पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट काढले जातात. निव्वळ विनोदी आणि मनोरंजनपर चित्रपट अशी काहींची भूमिका असू शकते. मात्र मला ज्वलंतशील सामाजिक विषयांवरील चित्रपटांनी कायम आकृष्ट केले आहे.
भूमिका पाहून मी कधीच चित्रपट साईन करत नाही. चित्रपटाची कथा महत्त्वाची. कथानक अधिक प्रभावी, सशक्त आणि परिणामकारक असेल तर भूमिका त्याच ताकदीची असते. ‘जोगवा’मध्ये तायप्पाची भूमिका आवडली. पुण्या-मुंबईपासून दोनशे-तीनशे किलोमीटर अंतरावर आजही एक कुप्रथा सुरू आहे. या विषयावर चित्रपट करावा, असे आम्हाला वाटले. या चित्रपटाची कथा कुणाच्याही हृदयाला भिडणारी आहे. त्यामुळे तो चित्रपट केला. माझ्या आगामी ‘क्षितिज’ चित्रपटाद्वारे अशाच एका सामाजिक विषयावर भाष्य करण्यात आले आहे. आपली संस्कृती आणि परंपरा विविधतेने नटली आहे. मात्र अनेक वेळा असे वाटते की, त्यात विरोधाभासाने ठासलेली आहे.
आपल्या समाजामध्ये अनेक बाबतीत विरोधाभास दिसून येतो. म्हणजे ज्याप्रमाणे मराठवाडा, लातूर या भागांमध्ये दुष्काळ आहे. तिथे अनेक शेतकऱ्यांची १५ ते २० एकर शेती आहे. मात्र पाणी नसल्यामुळे शेती पिकत नाही. परिणामी उपासमार होत आहे. उपजीविकेचे अन्य साधन नसल्यामुळे अनेक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करतात. काही ठरावीक काळ गिरणी कामगार म्हणून काम करताना वर्षभराचा खर्च निघेल, इतके पैसे गोळा करून परत जातात.
या सगळया परिस्थितीवरील भाष्य म्हणजे ‘क्षितिज’. त्या कुटुंबातील मुलीची शिक्षणाबाबत असलेली ओढ अशी चित्रपटाची कथा आहे. यात कुठलीही फँटसी नाही. समाजातील वास्तव रूप आहे. मला असे वाटत आले आहे की, गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांना राजमान्यता मिळतेय. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळताहेत. त्यामागील कारण म्हणजे भावस्पर्शी विषय.
आपल्या समाजात अनेक ज्वलंत विषय आहेत. समाजाशी निगडित अनेक विषय आजूबाजूला आहेत. अशा विषयांवरील चित्रपट करायला मला जास्त आवडतात. मात्र तशाच पद्धतीचे चित्रपट करायचे आहेत, असे मी स्वत:ला बंधन घालून घेतलेले नाही. मला कधी ‘पेज थ्री’, कधी ‘जोगवा’ अशा चित्रपटांमधील विविध आणि वेगवेगळया प्रकारच्या भूमिका करायला आवडतील. मला ठरावीक साच्यामध्ये अडकून पडायचे नाही. समाजात बदल घडवण्यास कारणीभूत ठरणारे किंवा सामाजिक संदेश देणारे सिनेमे करायला मला नेहमी आवडतील. ‘क्षितिज’ तशीच एक ‘सोशल’ फिल्म आहे.
रोमँटिक भूमिका करायला आवडतील का? तशा ‘ऑफर’ आल्या का?
रोमँटिक चित्रपट म्हणजे तुम्ही तशा पिक्चर्सकडे कसे पाहता यावर खूप काही अवलंबून आहे. गाणी म्हणत झाडाच्या मागे पळायचे, याला रोमान्स म्हणायचे का? तर मला हे पटत नाही. टू बी फ्रँक.. ‘जोगवा’ ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात रोमँटिक फिल्म आहे. तायप्पा आणि सुलीचे प्रेम कसे फुलत जाते आणि शेवटी ते कसे एकत्र येतात, या प्रकारे दिग्दर्शक राजीव पाटीलला चित्रपट बनवायचा होता.
चित्रपट करण्यापूर्वी कथानक आणि भूमिकेबाबत आमच्यात चर्चा झाली. त्याने मला भूमिका समजावून सांगितली. एक प्रेमकथा म्हणून चित्रपट बनवणार आहोत, असे राजीवने मला सांगितले. त्याने एक वेगळया प्रकारची ‘लवस्टोरी’ सादर केली.
मात्र बटबटीत केली नाही. ‘जोगवा’तील ‘जीव दंगला..’ हे गाणे इतके अप्रतिम लिहिलेले आणि संगीतबद्ध केले गेले की, त्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. माझे ते एक सर्वात आवडते प्रेमगीत आहे. अशा प्रकारच्या रोमँटिक भूमिका मिळाल्या तर नक्की करेन. नातेसंबंधांवर चित्रपटांत भूमिका करायला मला आवडते. म्हणून मी ‘गुरुपौर्णिमा’सारखा चित्रपट केला.
राष्ट्रीय पुरस्काराच्या आठवणींना उजाळा द्यायला आवडेल?
नक्कीच. ‘जोगवा’पूर्वी ‘मुक्ता’, ‘बनगरवाडी’, ‘सावरखेड-एक गाव’ असे मराठी तसेच ‘चांदनी बार’, ‘पेज थ्री’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ असे हिंदी चित्रपट आले होते. या चित्रपटांमुळे ‘जोगवा’तील ‘तायप्पा’ने मला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. माझ्यातील अभिनेता सर्व जगाला दिसला. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, असे प्रत्येक नटाला वाटत असते. माझे स्वप्न पूर्ण झाले. मात्र हा पुरस्कार मिळण्यात दिग्दर्शक राजीव पाटीलसह सर्व सहकारी आणि तंत्रज्ञांना जाते. चित्रपटाची मोठी चर्चा झाली. ‘जोगवा’ चित्रपटाला विविध पुरस्कारांसाठी ६० नामांकने मिळाली होती. त्यात ३७ पुरस्कारांवर नाव कोरले.
तब्बल साडेआठ वर्षानंतर छोटया पडद्यावर आलास? त्याबाबत काय सांगशील?
मला एक चांगली टीव्ही मालिका करायची होती. त्यात कुठेही बटबटीतपणा नसावा. चांगला विषय असावा, अशी माझी इच्छा होती. स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेद्वारे मला तशी मालिका मिळाली. या मालिकेतही नातेसंबंधांवर भाष्य करण्यात आले आहे. मात्र रटाळ किंवा तोच तोचपणा नाही. मुद्दामहून स्टोरी रंगवण्यात आलेली नाही. एका चांगल्या मालिकेचा भाग असल्याचा आनंद वाटतो.
‘जोगवा’मधील तायप्पा आणि ‘नकुशी’ मालिकेतील नायक या भूमिका वेगवगळया आहेत. दोन्ही माध्यम वेगवेगळी आहेत. त्यामुळे तुलना होऊच शकत नाही. एकांकिका, नाटक करण्याची मजा काही औरच असते. फिल्म करण्याचा आनंद वेगळा असतो. तसेच सीरियलबाबतही आहे.
प्रत्येक माध्यमाची एक रचना आहे. मांडणी आहे. तुम्ही त्याकडे कसे बघता, यावर तुमचे काम अवलंबून असते. एक नट म्हणून मी माझे कुठलेही ध्येय ठरवलेले नाही. मात्र चांगला आणि उत्तम अभिनय करत राहणे. तसेच भूमिकेत जीव ओतून काम करण्याला मी प्राधान्य दिले आणि यापूर्वीही देईन.
‘क्षितिज’, ‘नकुशी’ नंतर काय?
सध्या मी ‘नकुशी’ मालिकेसह ‘सेंटिमेंटल’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मी अशोक सराफ आणि रघुवीर यादवसोबत काम करतोय. ‘सेंटिमेंटल’ ही समीर पाटील यांची फिल्म आहे. त्यांनी ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
समीरचा प्रत्येक चित्रपट वेगळा असतो. हा चित्रपटही तसाच आहे. ‘सेंटिमेंटल’मध्ये त्याला मुंबई पोलिसांच्या मानसिकतेविषयी भाष्य करण्यात आले आहे. त्यात माझ्यासह अशोक सराफ, रघुवीर यादव आणि विकास पाटील अशा चौघांच्या प्रमुख भूमिका आहेत.
उपेंद्र हा भविष्यात चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल?
मला सध्या नट म्हणून काम करायला आवडेल. आता माझ्याकडे काही चांगले चित्रपट आहेत. काही ऑफर्स येत आहेत. त्यामुळे समोर असलेल्या कामाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतोय. भविष्यात चित्रपटाची निर्मितीसह दिग्दर्शनात नक्की हात अजमावेन.
शिक्षणाचे महत्त्व सांगणार ‘क्षितिज’
प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास उत्सुक असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले-मुली आपणास खेडोपाडयात पाहायला मिळतात. अशा मुलांच्या मानसिकतेचा परिमाण मांडण्याचा प्रयत्न ‘क्षितिज’ या चित्रपटामधून केला गेला आहे. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस.) आणि नवरोज प्रसला प्रोडक्शन्सचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर यांची सहनिर्मिती असलेल्या ‘क्षितिज’ या वास्तववादी सिनेमाचे दिग्दर्शन मनोज कदम यांनी केले आहे.
शिक्षणाचे महत्त्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचा संदेशही देणार आहे. अभिनय नव्हे तर आपल्या अभिनयातून सामाजिक शिकवण देणारा कुशाग्र अभिनेता उपेंद्र लिमये हा ‘क्षितिज’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
शिक्षणाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘क्षितिज’ सिनेमाची निर्मिती केल्याचे निर्माते नवरोज प्रसला यांनी म्हटले आहे. हा सिनेमा वास्तववादी जीवनावर आधारित आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणासाठी एका सामान्य मुलीचा हा संघर्ष असल्याचे अभिनेता उपेंद्र लिमये यांनी सांगितले.
या सिनेमात उपेंद्रसोबतच वैष्णवी तांगडे ही बालकलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे. या दोघांसह मनोज जोशी, विद्याधर जोशी, संजय मोने, कांचन जाधव, राजकुमार तांगडे, प्रकाश धोत्रे तसेच अर्णव मंद्रुपकर आणि आकांक्षा िपगळे हे बालकलाकार देखील या चित्रपटात आहेत.
‘क्षितिज’ या सिनेमाचे प्रमोशनल साँग प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे. त्यांच्या शब्दांवर शैलेंद्र बर्वे यांनी संगीतसाज चढवला आहे. प्रोफेसर रेबन देवांगे लिखित चित्रपटाचे संकलन नीरज वोरलीया यांनी केले आहे.
योगेश राजगुरू यांच्या कॅमे-यात चित्रित झालेल्या या चित्रपटाचे ध्वनिमुद्रण रसूल पुकुट्टी यांनी केले आहे, विशेष म्हणजे ध्वनिमुद्रण करताना रसूल यांनी नैसíगक आवाजांचा वापर केलेला आहे. सामाजिक बांधिलकी जपू इच्छिणारा ‘क्षितिज’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.