उत्पन्नाचे दाखले चुकीचे निघाले म्हणून गोरेगाव येथील खासगी शाळांमध्ये शिकणा-या १३६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारलेल्या पालकांनी मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.
मुंबई- उत्पन्नाचे दाखले चुकीचे निघाले म्हणून गोरेगाव येथील खासगी शाळांमध्ये शिकणा-या १३६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारलेल्या पालकांनी मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.
मात्र या भेटीत टोलवाटोलवीचे उत्तरे त्यांना मिळाल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षणमंत्रीच जर आमच्या प्रकरणाची दखल घेत नसतील तर आता आम्ही कोणाकडे न्याय मागायचा व आमच्या मुलांनी कुठे शिक्षण घ्यायचे? असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाल्याची प्रतिक्रिया पालक राजू चौधरी यांनी दिली.
गोरेगाव पूर्वेकडील गोकुळधाम, यशोधाम, लक्षधाम आणि सीटी इंटरनॅशनल शाळांत मागील तीन वर्षात शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर १३६ मुलांना पहिलीत प्रवेश मिळाले होते. मात्र यातील काही पालकांच्या उत्पन्नाच्या दाखल्यात चुका उघड झाल्याने त्यासाठीच्या तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने या विद्यार्थ्यांचे प्रवेश संबंधित शाळांनी मेपासून नाकारले.
तेव्हापासून हे पालक शिक्षणाधिकारी कार्यालयाला दररोज खेटे मारत आहेत. मात्र त्यांना तिथेही न्याय न मिळाल्याने मंगळवारी मोठया प्रयत्नांनी शिक्षणमंत्र्यांनी भेट घेतली. मात्र या भेटीत मंत्र्यांनी पालकांच्या चुकांवरच बोट ठेवत त्यांना टोलवाटोलवीचे उत्तर देऊन बोळवण केली.
शाळांमध्ये उत्पन्नाचा दाखला तुम्हीच सादर केला होता. त्यामुळे तुमच्याच चुका असल्याचे सांगत शिक्षणमंत्र्यांनी यावर आपण काही करू शकत नसल्याचे सांगितले. मात्र यात पालकांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करूनही त्यांचे काहीही ऐकून घेतले नसल्याचेही शिक्षणमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या इतर पालकांकडून सांगण्यात आले.
उपसंचालकांच्या आदेशाचे काय?
शिक्षण हक्क अधिकार कायद्यातील अनेक तरतुदींनुसार कोणत्याही मुलांना प्रवेशापासून वंचित ठेवता येत नाही. त्यातच शिक्षण उपसंचालकांनीही यासाठी एखाद्या पालकांच्या उत्पन्नाच्या दाखल्यात चुका आढळल्या तरी त्या मुलांचे प्रवेश नाकारण्यात येऊ नयेत, असे वेळोवेळी आदेश काढलेले आहेत.
याच आदेशाचा आधार घेऊन शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनीही या शाळांना प्रवेश नाकारण्यात येऊ नयेत, असे आदेश दिले आहेत. या आदेशांची माहिती ही शिक्षणमंत्र्यांना नाही की त्यांना आमचा प्रश्न सोडवायचा नाही? असा सवालही पालकांकडून करण्यात आहे.