मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने प्रशासनाने पाणीकपात मागे घेण्याचे ठरवले आहे.
मुंबई- मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने प्रशासनाने पाणीकपात मागे घेण्याचे ठरवले आहे. सर्व धरण क्षेत्रात मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अर्ध्या वर्षभराचा पाणीसाठा जमा झाल्यामुळे तसेच लोकप्रतिनिधींकडून मागणी होत असल्यामुळे प्रशासनाकडून कपात मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्यामुळे गटनेत्यांच्या सभेपुढे अथवा स्थायी समितीपुढे याबाबतचा प्रस्ताव ठेवून ही कपात पुढील आठवडयात मागे घेण्याची घोषणा केली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा आदी धरणांमध्ये मुंबईकरांच्या वर्षभराच्या १ लाख ४० हजार कोटी लिटर पाणीसाठयाच्या तुलनेत ६९ हजार ८२६ कोटी लिटर एवढा पाणीसाठा सध्या जमा आहे.
निम्म्या वर्षाचा साठा १६ जुलैपर्यंत जमा झालेला आहे. त्या तुलनेत मागील वर्षी या कालावधीत २७ हजार ८८६ कोटी लिटर एवढेच पाणी जमा झाले होते. ऑगस्टपर्यंत या पाणीसाठयात वाढ होत नसल्यामुळे वर्षभराच्या पाणीपुरवठयाचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने २५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात जाहीर केली. पाणीपुरवठयात २० टक्के आणि वेळेमध्ये १५ टक्के अशाप्रकारे कपात करण्यात आली होती.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये लागू केलेली पाणीकपात आजही लागू असून धरण क्षेत्रात चांगल्याप्रकारे पाऊस पडत असल्यामुळे ही कपात मागे घेण्याची मागणी आता सर्वच स्तरातून केली जात आहे. त्यामुळे महापालिका जलअभियंता विभागानेही आता कपात मागे घेण्यास काहीच हरकत नसल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांना कळवले आहे.
लागू करण्यात आलेली कपात मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवण्यात येत आहे. त्यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव येत्या गटनेत्यांच्या सभेत तसेच स्थायी समितीपुढे आणून कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिका-यांकडून समजते.