‘एमआयएम’सह १९१ पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. आयोगाने मागितलेली आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने आयोगाने राज्यातील एमआयएमची नोंदणीच रद्द केली आहे.
मुंबई- ‘एमआयएम’सह १९१ पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. आयोगाने मागितलेली आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने आयोगाने राज्यातील एमआयएमची नोंदणीच रद्द केली आहे.
तसेच आगामी निवडणुका लढवण्यास बंदी घातली. दरम्यान, एमआयएमने आयोगाच्या निर्णयावर याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने काही राजकीय पक्षांना त्यांची प्राप्तिकर विवरणपत्रे व लेखा परीक्षण लेखाची प्रत सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यापैकी ज्या पक्षांनी ही कागदपत्रे सादर केली नाहीत, त्या १९१ पक्षांना आयोगाने नोटीस बजावून त्यांची नोंदणी आणि चिन्ह गोठवण्याची कारवाई केली. या १९१ पक्षांमध्ये ‘एमआयएम’ पक्षाचाही समावेश आहे.
एमआयएम पक्षाने अल्पावधीतच राज्यातील राजकारणात आपली दखल घेण्यास भाग पाडले. एमआयएमचे दोन आमदार बहुमतांनी निवडून गेले आहेत. भारदस्त भाषणे आणि जहाल वक्तव्ये करून एमआयएमच्या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना हादरे दिले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणे हे एमआयएमचे लक्ष्य आहे.
मुंबई पालिका निवडणूक जवळ आली असताना निवडणूक आयोगाने एमआयएमची मान्यता रद्द करत आणि आगामी निवडणुका लढविण्यास बंदी घालत एमआयएमला मोठा धक्का दिला. आयोगाच्या या निर्णयामुळे ओवेसी बंधूंची झोप उडाली असून आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे एमआयएमचे नेते असाऊद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील प्रत्येक पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपले प्राप्तिकर विवरणपत्र आणि लेखा परीक्षण लेखाची प्रत सादर करणे अपेक्षित असते. मात्र, आयोगाकडे ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त पक्षांचा समावेश आहे.
उर्वरित सर्व ३४२ अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. नोंदणी रद्द केलेल्यांमध्ये मुंबईतील ऑल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस, शिवराज्य पक्ष, नॅशनल लोक तांत्रिक पार्टी, राष्ट्रवादी समाजवादी पक्ष, भीमशक्ती रिपब्ल्किन सेना अशा पक्षांचा समावेश आहे.