रंगज्ञानाचे बाळकडू देणारे प्रा. राजेंद्र ढवळे यांचे चित्र आणि शिल्पकृतींचे ‘अनुभूती’ हे कला प्रदर्शन या आठवडयात सुरू असतानाच, पुढच्या आठवडयात बालकदिनाचे औचित्य साधून १७ नोव्हेंबरपासून छोटया दोस्तांच्या रंगलेखनाचे प्रदर्शन नेहरू सेंटरमध्ये सुरू होत आहे. प्रा. राजेंद्र ढवळे यांच्या कलाकृतींसोबतच बालकलावंतांचे निसर्गचित्र रसिकांना भुरळ पाडणारे ठरतील, एवढे आश्वासक रंगलेखन या कलावंतांनी केले आहे.
छोटया दोस्तांचे निसर्गरंग!
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज १२६वी जयंती. चाचा नेहरूंचा जन्मदिन भारतभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून नेहरू सेंटरने छोटया दोस्तांच्या रंगलेखनाचे प्रदर्शन १७ नोव्हेंबरपासून आयोजित केले असून, हे ‘बाल दिशा’ हे विशेष चित्रकला प्रदर्शन २३ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात नमन तलरेजा, पलाश गाला, रेया गोरवारा आणि वृषभ जैन या बाल कलाकारांनी साकार केलेल्या कलाकृती वरळी येथील नेहरू सेंटरच्या कलादालनात मांडल्या जाणार आहेत.
कॅम्पन स्कूलमध्ये पाचवीत शिकणारा नमन तलरेजाची रंग आणि प्रयोगिक शैली पाहण्यासारखी असून, नसíगक प्रतिभा आणि कलेप्रती असलेली आवड त्याच्या वास्तववादी निसर्ग चित्रांमधून दिसून येते. नऊ वर्षीय पलाश गाला हा जी. डी. सोमाणी शाळेचा विद्यार्थी असून, कॅनव्हासवर केलेल्या रंगलेखनातून निसर्गसौंदर्य साकारले आहे.
दहा वर्षाची रेया गोरवारा पाचवीत शिकत असून, ती मुंबईतील राणी मेरी स्कूलची विद्याíथनी आहे. निसर्ग आणि त्याचे सौंदर्य यापासून प्रेरणा घेऊन तिने आपल्या चित्रांमधून चैतन्याचा आभास निर्माण केला आहे. जलरंग आणि पेस्टल्स अशा विविध माध्यमांचा वापर करून तिने आपली चित्र रंगवली आहेत.
सेंट झेवियर्स बॉय अकादमीमध्ये पाचवीत असलेला वृषभ जैन याने चारकोलचा वापर करून कागदावर रेखाटलेल्या कलाकृती अचंबित करणा-या आहेत. या चार बालकलाकारांचा निसर्गचित्रांचा अनोखा नजराणा या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. बालवयातच कसलेल्या चित्रकाराचा हात आणि कुंचल्याची कॅनव्हासवरची जादू पाहण्याची संधी ‘बालकदिना’चे औचित्य मुंबईकरांना मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून, नेहरू सेंटरने त्यांच्या रंगलेखनाचा केलेला हा सन्मान ठरणार आहे.
सुप्रसिद्ध कलाकार प्रा. राजेंद्र ढवळे यांनी साकारलेल्या चित्र आणि शिल्पकृतींचे ‘अनुभूती’ हे कला प्रदर्शन जहांगीर कलादालनात १० नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते १६ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे.
गावातले मूळ रहिवासी हे नेहमीच प्रा. राजेंद्र ढवळे यांच्या कला आणि शिल्पकला प्रदर्शनाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. दररोजच्या जीवनात मनुष्य वेगवेगळ्या मन:स्थितीमधून जात असतो. कधी तो तिरस्कार करतो, कधी प्रेम तर कधी मत्सर. रंगलेखक या भावभावनांचा आलेख कॅनव्हासवर साकार करीत असतो. आनंद, उत्सुकता, प्रेम, दु:ख, निरागसता या भावनांशी एकरूप होऊन, प्रा. ढवळे यांनी कल्पनाशक्तीचा वापर करून या प्रदर्शनात कलाकृती पेश केल्या आहेत.
या प्रदर्शनातील कलाकृती घडवताना फाईबर, लाकूड, कॅनव्हास इत्यादी माध्यमांचा वापर केला असून, पाच ते दहा फूट आकार असलेली शिल्प हे प्रमुख आकर्षण असणार आहे. प्रा. राजेंद्र ढवळे हे गेली वीस र्वष पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात कलाज्ञान देत असून, या कालावधीत त्यानी सहा एकल आणि दहा समूह प्रदर्शनात भाग घेऊन आपली कला रसिकांसमोर पेश केली आहे.
राज्य आणि राष्ट्रीय स्थरावरच्या अनेक स्पर्धामधूनही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. प्रा. राजेंद्र ढवळे यांनी पुणे आणि मुंबई (जे. जे. कला महाविद्यालय)मधून आपले कला शिक्षण पूर्ण केले आहे.
प्रसिद्ध रंगलेखक विनोद शर्मा यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात १० नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, ते १६ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात विनोद शर्मा यांनी आपल्या अभूतपूर्व व कलात्मक शैलीत निर्मिलेल्या अनोख्या चित्रांचे अतिशय रम्य व मनोवेधक असे सादरीकरण केले आहे.
चित्रकार विनोद शर्मा यांनी प्रस्तुत प्रदर्शनात सादर केलेली विविध निसर्गचित्रे, त्यांच्यातील अलौकिक प्रतिभाशक्तीचे व कल्पकतेचे दर्शन घडवितात. वास्तव व भास ह्यातील परस्परांशी निगडित अशा भावनिक समरसतेचे व कलात्मक अभिव्यक्तित्वाचे आपल्या कलात्मक व वैशिष्टय़पूर्ण शैलीत मिश्रण करून त्यातील अचूक अशी भावनिक उत्कटता व प्रसंगानुरूप उत्स्फूर्तता यांचे दर्शन चित्रमाध्यमातून सर्वाना घडवले आहे. त्यांच्या चित्रांमधून मानवी मनाचा निसर्ग व त्याची विविध वैशिष्टय़े यांचा नयनरम्य आविष्कार घडविला आहे.
आधी दिल्ली व नंतर बडोदा येथे कलेचे रितसर असे शिक्षण पूर्ण केल्यावर विनोद शर्मा यांनी आपली चित्रे अनेक एकल व सामूहिक अशा प्रदर्शनातून रसिकांपुढे विविध कलादालनातून मांडली. त्यांच्या प्रदर्शनांना व कलात्मक सादरीकरणाला नेहमीच रसिकांचा व कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
अच्युत पालव यांचे सुलेखन सातासमुद्रापार!
सुलेखन म्हटले की पटकन आठवतात अच्युत पालव! भारतीय सुलेखनकलेत विविध माध्यमांतून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या अक्षर शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पॅरिस शहरात होणा-या एका व्यावसाईक संकुलाच्या सुशोभनाकरिता प्रथमच एवढया मोठया प्रमाणावर सुलेखनाचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जगातील सर्व लिप्यांचा अभ्यास करून कलात्मकदृष्टया अधिक सुंदर दिसणा-या लिपींची निवड करण्यात आली असून, अच्युत पालव यांनी केलेल्या देवनागरी लिपीवरील कामाचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे.
देवनागरीबरोबर तेहरान, रशिया, फ्रांस, चीन अशा वेगवेगळ्या देशांतील लिप्यांची कलात्मक रूपे पॅरिसमध्ये पाहावयास मिळणार आहेत.
पार्किंग, रेस्टॉरंट, पब्लिक एरिया, कॉनफरन्स अशा वेगवेगळ्या भागात विचारांबरोबर सुलेखनाचे कलात्मक रूप मांडताना मूळ लिपी आणि त्या त्या लिपितील त्या त्या जागेला साजेसे असे सुविचार मांडायचे आहेत. जे अक्षरातून सांगता येत नाहीत ते चित्रांमधून सांगता येतात, मात्र सुलेखनात अक्षरेच चित्रे बनून जातात.
अक्षरे सर्वाचा पलीकडे जाऊन कशी बोलतात हे सुलेखनातून दिसून येते. सुलेखन पुराणाशी नाते सांगणारी कला आहे. यामुळे भारतीय संस्कृतीतील ‘अतिथी देवो भव’, ‘विद्या विनयेन शोभते’ हे आणि यासारखे सुविचार कलाप्रेमींना अर्थासकट वाचायला तसेच कलात्मकदृष्टया पाहायला मिळणार आहेत. मराठीचा अभिमान वाटेल अशी गोष्ट घडल्यामुळे अच्युत पालव यांनी आनंद व्यक्त केला.
नुकताच अच्युत पालव यांनी गंगा नदीच्या किना-यावर अस्ती घाटावर सकाळच्या प्रहराला १०० फूट लांब आणि ३ फूट रुंद अशा कागदावर ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, शिक्षित भारत’ असा संदेश देवनागरी लिपीतून साकारला होता. अच्युत पालव हे सातत्याने गेली ३३ वष्रे सुलेखनकार म्हणून काम करत असून जगभरात भारतीय सुलेखन कला पोहोचावी यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.
कर्जतमध्ये रंगावली!
कर्जत शहरातील पाटील आळीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गेल्या पन्नास वर्षात मंडळाने अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला आहे.
३७ वर्षापासून दीपावलीच्या दिवसांत रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ते भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले असून, यानिमित्ताने उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. हे रांगोळी प्रदर्शन १५ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनात प्रसिद्ध चित्रकार सुनील परदेशी यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोण, किसन खंडोरी यांनी कुंभमेळ्यातील साधू, सविता शेलवले यांनी सरदार वल्लभभाई पटेल, प्रकाश पटवर्धन यांनी आशा मंगेशकर, प्राची घोसाळकर यांनी भारतरत्न अब्दुल कलाम, प्रदीप घाडगे यांनी मोगॅम्बो (अमरिश पटेल), विजयश्री बेडेकर यांनी खंडोबा, रोहन डांगर या नवोदित कलाकाराने अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या रंगावल्या साकारल्या असून, राजन दगडे या अनुभवी कलाकारांबरोबरच नवगीता सुतार, निखिल दगडे, श्रुती साळोखे, रवींद्र वझरेकर, समृद्ध शेलवले, मनोज देशमुख आदी नवोदित कलाकारांनीही विविध विषयावरील रांगोळ्या साकारून प्रदर्शनात जिवंतपणा आणला आहे.