मध्य रेल्वेमध्ये गँगमन म्हणून कार्यरत असलेल्या दशरथ वरुंदा यांच्या सतर्कतेमुळे सकाळी साडे सहाच्या दरम्यान आसनगाव लोकलचा अपघात टळला.
मुंबई- मध्य रेल्वेमध्ये गँगमन म्हणून कार्यरत असलेल्या दशरथ वरुंदा यांच्या सतर्कतेमुळे सकाळी साडे सहाच्या दरम्यान आसनगाव लोकलचा अपघात टळला. वाशिंद स्थानकाजवळच रेल्वे रूळाला १४ इंचांचा तडा गेला होता. त्याकडे वरुंदा यांचे लक्ष गेले. त्यांनी तातडीने स्टेशन मास्तरांना याची कल्पना दिली. दरम्यानच्या काळात आसनगावहून सीएसटीला जाणारी लोकल वाशिंद स्थानकात पोहचली होती. ती सीएसटीच्या दिशेने सुटणार तेवढय़ात स्टेशन मास्तरांना वरुंदा यांनी दिलेल्या माहितीमुळे त्यांनी पुढील हालचाली करून ही रेल्वे थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दशरथ वरुंदा हे विद्याविहार येथे गँगमनचे काम करतात. रात्रपाळी आटोपून ते आपल्या घरी वाशिंदला सकाळी पोहोचले होते. घरी जाताना त्यांना वाशिंद स्थानकाच्या थोडे पुढे रेल्वे रूळाला १४ इंचांचा तडा गेल्याचे दिसून आले. याचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने ही बाब स्टेशन मास्टर यांना कळवली. दरम्यानच्या काळात आसनगावहून सीएसटीला जाणारी लोकल वाशिंद स्थानकात पोहचली होती. ती सीएसटीच्या दिशेने सुटणार तेवढय़ात स्टेशन मास्तरांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ती माहिती आसनगाव लोकलच्या गार्डला दिली. गार्डने ती माहिती मोटरमनपर्यंत पोहचवली आणि पुढील अनर्थ टळला. त्यानंतर ती गाडी तब्बल एक तास वाशिंद स्थानकात उभी होती.
वरुंदा यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळेच हे शक्य झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. त्यांच्या या कामगिरीची नोंद घेऊन महाव्यवस्थापकांकडे पुरस्कारासाठी वरूंदा यांची शिफारस करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एक तासानंतर हा तडा भरुन काढण्यात आला. तोपर्यंत कसा-याहून कल्याणला जाणा-या दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या. नागपूर दुरोन्तो, पंजाब मेल आणि रांची एक्सप्रेस या गाडय़ा मुंबईत ४५ मिनिटे उशिराने पोहोचल्या.