‘अनेक तरुणांना त्यांच्या एकांकिका बसवण्यात मदत करणारी आई’ अशी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची पत्नी शुभदा कर्णिक यांची ख्याती होती. त्यामुळेच त्या एकांकिका करणा-यांच्या वर्तुळात ‘एकांकिकेची आई’ म्हणून परिचित होत्या. अशा माऊलीचं ६ जून २०१३ रोजी देहावसान झालं. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.
आम्ही स्पर्धामध्ये एकांकिका करण्यासाठी एका ग्रुपची स्थापन केली होती. ग्रुपचं नाव होतं, ‘ठा’. हा शब्द म्हणजे ‘दि थिएट्रिकल हेलो असोसिएशन’ या तीन शब्दांच्या एकत्रिकरणाचा शॉर्टफॉर्म होता. ग्रूपच्या स्थापनेचं साल होतं १९९२. ‘कै. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी डॉ. अनिल बांदिवडेकरांची ‘कृष्णछाया’ एकांकिका करण्याचं ठरलं. पात्रांची जमवाजमव झाली. यात महत्त्वाचा सहभाग होता तन्मय कर्णिकचा. तन्मयचं, माझं आणि सहभागी असलेल्यांचं कॉलेज संपलेलं होतं.
रंगभूमीशी नातं आणि नाळ तुटली जाऊ नये या विचारांनी म्हणा किंवा या क्षेत्रात पुढे काहीतरी करता येईल या उद्देशाने म्हणा, चळवळ म्हणून अजूनही आताची मुलं जे काही करतात, त्याचाच तो एक भाग होता. मुंबईतल्या नाटयकर्मीना सर्वात अडचणीत आणणारी गोष्ट म्हणजे.. रिहर्सलची अर्थात तालमीची जागा. तन्मयने हा प्रश्न चुटकी सरशी सोडवला. म्हणाला, ‘‘पार्ल्यातला आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर तालीम करू..!’’ आणि तालमीच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी साडेसात-आठ वाजता तन्मयची आई चहा घेऊन गच्चीवर आली. तेव्हापासून आमच्या पुढल्या प्रत्येक एकांकिकेची ती आई झाली.
मधु मंगेश कर्णिकांना आम्ही केलेल्या एकांकिकांमध्ये तसा रस नसायचा. ते आपले आम्हा मुलांची झडती घेतल्याप्रमाणे एकांकिकेविषयी विचारणा केल्यासारखं बोलायचे. त्यांच्या अनुभवापुढे आमचं नाटयज्ञान अर्थातच तोकडं पडे. आमच्या बाजूने अधिकारवाणीने बोलणारी आणि पप्पांशी भांडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आमच्या एकांकिकेची आई. गच्चीवर येऊन आमची रिहर्सल बघण्यात तिला प्रचंड रस.
दिग्दर्शक म्हणून मला कुणी विचारले नसतील, एवढे प्रश्न विचारून ती भांबावून सोडायची. पप्पांची आणि इतर अनेक रंगभूमीवरील नाटकं बघता बघता तिची प्रेक्षक म्हणून नजर पक्की झालेली. रिहर्सल बघून ही एकांकिका नंबरात येणार की नाही, याबद्दलचा तिचा अंदाज विलक्षण होता. दामलेंच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेसाठी एका वर्षी दीपक पडतेने ‘सेट’ हा विषय दिला होता. कल्पनेचा मुद्दा ठीक आहे; पण आखून दिलेल्या नेपथ्यावर एकांकिका करायची आणि नव्याने लिहून ती सादर करायची म्हणजे प्रचंड वादाचा मुद्दा होता.
उद्या एखाद्या प्रकाशयोजनाकाराने दोन स्पॉट दिले, पैकी एकाचा रंग लाल आणि एकाचा निळा आणि सांगितले की हाच विषय.. आता लिहा एकांकिका आणि सादर करा, तर ते तसे तार्किकतेला धरून होणार नाही. कारण नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना तथा संगीत या नाटयनिर्मितीच्या सहाय्यकतेची भूमिका पार पाडतात. हेच त्या आखून दिलेल्या सेटच्या बाबतीत झाले होते. आम्ही कर्णिकांच्या घरी तासन् तास या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करीत असू. एक दिवस मी लवकर गेलो होतो. चहा देता देता आई म्हणाली.. ‘‘या सगळ्या नको त्या विषयांवर चर्चा करत बसण्यापेक्षा नेपथ्य हा विषय तुम्ही विचारातच घेऊ नका..! बाकीच्यांना काय करायचंय ते करू देत.. आखून दिलेल्या सेटवर तुम्हाला हवी तशी एकांकिका करा.’’ आणि विषयानुरूप विचार करायची दिशाच बदलून गेली.
दिग्दर्शक म्हणून सेटचा विचारच करायचा नाही, असे ठरवून जी. ए. कुलकर्णीच्या ‘दूत’ या कथेवर ‘गिधाड’ नावाची एकांकिका सादर केली. एकांकितेत संदीप सावंत (श्वासचा दिग्दर्शक), स्वत: तन्मय कर्णिक, शेखर सरतांडेल, कुमार दवे, ऋषी देशपांडे, राहुल मेहेंदळे आणि कै. ऋत्विज काळसेकर, कै. सतीश बत्तिन ही मल्टीस्टार कास्टिंगची एकांकिका केवळ सेटचा विचार न करता सादर केल्यामुळे अंतिमला होती. हे श्रेय ना माझं ना लेखकाचं.. ते केवळ शुभदा मधु कर्णिकांचं होतं.
‘कृष्णछाया’वरून आठवलं.. मुंबईत तालिमी करून दोन दिवस आधीच आम्ही कणकवलीत कर्णिकांच्या घरी करुळला पोहोचलो. खळ्यात दोन नाटकांच्या तालिमी होतील एवढी जागा. दिवसा एकांकिकेत काम करणा-या मुली आईला जेवणासाठी मदतही करत आणि फावल्या वेळात रीडिंगची तालीम.
स्वयंपाकघरात आई मुलींकडून पोळय़ा लाटता-लाटता तालीम करून घ्यायची. आम्हाला स्वयंपाकघरात जाण्यास मनाई होती. त्यामुळे मुलींबरोबरच्या इतर पात्रांची ‘प्रॉक्सी’ आई स्वत: घ्यायची. आमच्या रीडिंगला मात्र टिवल्या-बावल्या चालायच्या. रात्री ख-या अर्थाने तालीम सुरू व्हायची. माझ्यातला ‘तालीम मास्तर’ हातात छडी घेऊन जागा व्हायचा. एका प्रसंगात तन्मय निपचित पडतो आणि पाठीमागच्या बाजूला एक वेगळा प्रसंग घडतो. माझं लक्ष पाठीमागे घडणा-या आणि सातत्याने चुकणा-या कलाकारांवर होतं.
मी त्यांना दृश्यांमधल्या इंटेन्सिटीबद्दल बोलतोय, समजावतोय.. अंगणातल्या सुरंगीच्या सुवासामुळे शांत असलेल्या वातावरणात केवळ माझ्या चिडचिडीचा आवाजच काय तो येत होता. इतक्यात आईच्या हसण्याच्या आवाजाने मी थांबलो, थोडा गोंधळलो.. मागे बघतो तो आई हातात चहाचे कप घेऊन मी तन्मयकडे बघावं, असा निर्देश करत होती. म्हणून तन्मयकडे गेलो तर तो ठार घोरत पडला होता. ‘‘रिहर्सल बघ किती मन लावून करतायत तुझी पात्रं.. ख-या अर्थाने झोपवणारं हे नाटक..’’ मी तन्मयला लाथा घालून उठवला खरा; पण एकांकिका काही उठू शकली नाही..
पुढे पार्ल्याच्या गच्चीत आम्ही ‘सुनीला पारनामे शाळेत जात होती’ आणि ‘पांदेगा’ केली. दोन्ही एकांकिकांचा दिग्दर्शक मी नव्हतो. रोज सकाळी मात्र तन्मयचं आणि माझं बोलणं व्हायचं. एकदा तन्मय नव्हता म्हणून आईने फोन घेतला.. ‘‘अरे बाबा रिहर्सलला कधी येतोयस? तुझी आरडाओरड, शिवीगाळ, छडीचा मार देणा-या दिग्दर्शकाची उणीव भासतेय..! याच्या तालमींना काहीच अर्थ नाहीए.. येत जा, संध्याकाळचा..!’’ तिची आज्ञा मानून मी गच्चीत दाखल झालो. आईची नेहमीप्रमाणेच चहा घेऊन एंट्री झाली ‘एकांकिकेत मजा नाही.. तुला सांगते या मतकरींच्या सस्पेन्स स्टो-या स्पर्धेच्या ठिकाणी करूच नयेत.. वैयक्तिक बक्षिसं त्या-त्या पात्रांना मिळतील.. पण सांघिकतेच्या बक्षिसाकडे परीक्षक पाठ फिरवतील..’’ आणि तसंच झालं.. खरं तर ‘सुनीला पारनामे..’, प्रकाश बुद्धिसागरांनी एका टोकाला नेऊन ठेवली होती.
वैयक्तिक अभिनय, दिग्दर्शन अथवा प्रकाशयोजनेच्या अफाट कल्पनाशक्तीवर त्या एकांकिकेला अनेक पारितोषिकं मिळालीही होती; पण ती बुद्धिसागरांच्या मांडणीची जादू होती. ती जादू करायला परत बुद्धिसागरच हवेत. ही माझी नाहीत आईची मतं होती. कुठल्याही एकांकिकेची, ‘निवड’ हा मुद्दा जितका महत्त्वाचा तितकाच त्यातील पात्रांची निवडदेखील तेवढीच महत्त्वाची असते, असं ती ठाम समजावून सांगायची.
आमच्या काय किंवा पप्पांच्या नाटकांबद्दल पात्रांच्या निवडीची एक प्रक्रिया समांतरपणे आईच्याही डोक्यात चालू असायची. लेखकाने साकारलेल्या व्यक्तिरेखेला तो नट अथवा नटी अनुरूप नसला किती टिपिकल नाक मुरडायची.. आणि काही खरं नाही, असं व्यक्त करणारी हसत मान डोलवायची. ब-याचदा तन्मय तिला ऑर्डर सोडायचा, आम्हाला जेवायला वाढायला सांगायचा.. ‘‘ताटात पडेल ते खायची तयारी असेल तर जेवा,’’ असा धमकीवजा पाहुणचारही आम्ही अनुभवलाय.. गुपचुप खाली माना घालून जेवलोयसुद्धा..!
हल्ली ब-याच वर्षानी अंधेरीच्या घरी जाण्याचा योग आला. पप्पांच्या आणि माझ्या रंगलेल्या गप्पा आई मिश्कीलपणे ऐकत होती. करायला जमत नव्हतं; पण काहीतरी करायचा प्रयत्न करत होती. मधेच कापून सफरचंद आणून दे, मधेच फ्रीजमध्ये ठेवलेली मिठाई आणून दे.. भाजी निवडत बसली होती.. निघालो तेव्हा किचनमध्ये चपात्या करत होती.
‘‘अगं हा निघालाय बघ..! ओळखलंस ना याला?’’ पप्पांनी विचारलं.. आतूनच तिने नकारार्थी मान डोलावली.. आणि माझा ठोका चुकला. सांगावंसं खूप वाटत होतं.. त्यातल्या त्यात ‘ठा’ चा केलेला फुलफॉर्म आणि मान डोलावत प्रतिक्रियेदाखल खळखळून मिळालेला मिश्कील रिस्पॉन्स..! परवा ज्या वेळी तिच्या निधनाची बातमी ऐकली तेव्हा वाटलं.. श्या..! निदान आई मिळवण्यासाठी तरी गच्चीत पुन्हा एकदा एखादी एकांकिका करायला हवी होती..!