स्मिता तळवलकर गेल्या, एक खरी न वाटणारी बातमी गेल्या मंगळवारी आली व दिवस सुन्न करून गेली. स्मिताताई गेल्या अनेक दिवस कर्करोगाशी झुंजत होत्या.हा झुंझारपणा त्यांच्या स्वभावात कायमचा. प्रत्येक काम करताना त्यांच्यातली ताई, आई दिसून यायची.
स्मिता तळवलकर गेल्या, एक खरी न वाटणारी बातमी गेल्या मंगळवारी आली व दिवस सुन्न करून गेली. स्मिताताई गेल्या अनेक दिवस कर्करोगाशी झुंजत होत्या. हा झुंझारपणा त्यांच्या स्वभावात कायमचा. प्रत्येक काम करताना त्यांच्यातली ताई, आई दिसून यायची. त्यांच्या निधनाबाबतच्या टीव्हीवरच्या प्रतिक्रियांमध्ये सुबोध भावेची प्रतिक्रिया बोलकी होती, नेमकी होती. कोणालाही काही त्रास झाला तर तो स्मिताताईंना सांगायचा व त्या त्यावर एक असा तोडगा सांगायच्या की त्यातून ती समस्या समस्याच राहायची नाही. बरं, हा तोडगा सुचवताना त्यांची भूमिका केवळ सूचकाची नव्हे तर समोरच्या व्यक्तीची पूर्ण जबाबदारी घेणारी असायची. स्मिताताई या निर्मात्या होत्या.
आपल्याकडे केवळ पैसे आहेत म्हणून चित्रपटांची वा नाटकांची निर्मिती करणारे अनेकजण असतील. स्मिताताईंचं मात्र या माध्यमावर जबरदस्त प्रेम होतं. आपली निर्मिती ही सर्वागानं वैशिष्टयपूर्ण असावी यावर त्यांचा कटाक्ष होता. पैशांची गणितं करत निर्मितीवर अन्याय करणा-यांपैकी त्या नव्हत्या. कलाकारांना, दिग्दर्शकांना व इतरांनाही जे जे हवं ते देण्यासाठी व त्यांच्याकडून चांगलं काम करवून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. मालिका, टीव्ही व नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी लिलया संचार केला. केवळ आपल्यापुरताच विचार न करता आपल्यामुळे या इंडस्ट्रीचं भलं कसं होईल याचा त्या विचार करत.
परखडपणा, स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या स्वभावात होता तसाच तो त्यांच्या विचारात होता. काळाची पावलं ओळखून त्या वागत असत. आता हेच चालतं, तेच चालतं अशा विचारांनी त्यांनी चित्रपट केले नाहीत. ‘चौकट राजा’ सारखा चित्रपट करायचा त्यांनी ठरवलं, तेव्हाच्या मराठी चित्रपटांचा विचार करता तो काळाच्या कितीतरी पुढचा विचार होता याची साक्ष आपल्याला सहज पटेल. आपल्या चित्रपटाच्या वा मालिकांच्या बाबतीतही त्यांनी हाच दृष्टीकोण बाळगला. ‘अवंतिका’ ही मालिका जेव्हा त्यांनी टीव्हीवर आणली तेव्हा टीव्हीवर एकसुरी मालिका सुरू होत्या. एका मुलीच्या आयुष्याची कथा, तिच्या जीवनात आलेले विविध टप्पे हा एक ट्रेंडच ‘अवंतिका’ या मालिकेने तयार केला. ‘कळत नकळत’ या चित्रपटाची कथाही अशीच. पतीपत्नी नात्याकडे समानतेच्या दृष्टीकोणाने पाहण्याचा काळ तेव्हा यायचा होता. त्या काळात त्यांनी हा चित्रपट आणला व तो यशस्वी करून दाखवला. आहे त्याच विषयांमध्ये चित्रपटांची निर्मिती न करता काळाच्या पुढच्या विषयांमध्ये निर्मिती करण्याचा त्यांचा स्वभावधर्म त्यांनी पाळला.
एक व्यक्ती म्हणून जर त्यांच्यातला कोणता गुण सर्वाधिक भावत होता तर तो त्यांचा धाडसीपणा. कोणताही निर्णय घेतला की त्यांना कोणीही अडवू शकत नव्हतं. व्यक्ती तर दुरच, कोणतं संकटही त्यांना रोखू शकत नव्हतं. अनेक निर्माते केवळ दिग्दर्शकांनी सांगितलेल्या कथांचाच विचार करतात. स्मिताताईंचं स्वत:चं वाचन अफाट होतं. अनेक नव्या कल्पना घेऊनच त्या वावरत असत. पत्रकारांशी बोलतांना त्यांच्या वृत्तीतला मोकळेपणा सहज आढळत असे. मागे एकदा बोलतांना त्या म्हणाल्या होत्या की मनोहर तेल्हार यांच्या ‘माणूस’ या कादंबरीवर एक चित्रपट करायचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. त्यासाठी एकदोनदा त्या अमरावतीला जाऊन आल्या होत्या. आता अमरावती कशी आहे? हा चित्रपट तिथे करता येईल का? अशी विचारणाही त्या करत असत. एका इंग्रजी चित्रपटाच्या कथेवरही चित्रपट करण्याचं त्यांच्या डोक्यात घोळत होतं.
अर्थात या कल्पना त्यांनी मला सांगितल्या होत्या. अशा कितीतरी कल्पना त्यांच्या मनात घोळत असतील याचा काही नेम नाही. निर्मितीच्या बाबतीतही आपण कधी चित्रपट करायचा, कधी करायचा नाही याचेही आराखडे त्यांच्या मनात स्पष्ट असत. काही वर्षापूर्वी जेव्हा अनेक नवीन मराठी निर्माते मराठी चित्रपटांची निर्मिती करत होते तेव्हा ही वेळ माझ्यासारख्या निर्मात्यांनी निर्मिती करण्याची नाही असं त्या म्हणाल्या. स्मिताताई केवळ चित्रपटाची कथा वा दिग्दर्शक यांचाच विचार करत नसत. तर अनेक नवनवीन लोकेशन, वेगळ्या पद्धतीचं तंत्र वापरून सतत अद्ययावत राहणंही त्यांना आवडत असे. आज जगात नवीन काय आहे त्याचा वापर माझ्याकडून झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. कलाकारांची निवड करतानाही त्यांचा हाच आग्रह असे. अत्यंत धडाडीने निर्मिती करणारी व्यक्ती आज आपल्यातून गेली यावर खरोखरच विश्वास बसत नाही. स्मिताताईंची दूरदर्शनवरची कारकिर्द असो, अभिनयाची असो वा निर्मितीची असो. एक धडाडीच्या व धाडसी निर्मातीचं हे जाणं खरोखरच मनाला चटका लावून जाणारं आहे यात शंका नाही. स्मिताताईंना आदरांजली वाहताना त्यांचा तो बोलका चेहरा, हसरे डोळे व शब्दाशब्दांतून जाणवणारा सळसळता उत्साहच नेमका लक्षात राहातो.