आसमंतातून कोकिळेचं गुंजन ऐकू येऊ लागलं की, वसंत ऋतूची चाहूल लागते. रंगपंचमीच्या रंगात रंगून झालं की मराठी मनाला वेध लागतात ते नव्या वर्षाचे. गुढीपाडवा हा मराठी संवत्सराचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा सण मराठी माणसांसाठी महत्त्वाचा. आपण इंग्रजी नववर्ष इतक्या उत्साहाने साजरं करतो तर मराठी का नाही? या भावनेने गेल्या काही वर्षापासून गुढीपाडवा जास्तच उत्साहाने साजरा केला जातोय. मराठी करमणूक विश्वासाठी तर हा दिवस अधिकच उत्साहाचा. या सणाच्या पाठोपाठ येणा-या सुटीच्या मोसमामुळे मराठी करमणूक विश्वात उत्साहाचं वातावरण आहे. येणारं मराठी नववर्ष मराठी करमणूक विश्वासाठी कसं असेल? या वर्षी प्रेक्षकांच्या वाटय़ाला काय काय येणार, मालिकांच्या त्याचबरोबर एकंदरीतच सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेण्याचा केलेला हा प्रयत्न –
मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास गुढीपाडव्याचं औचित्य साधून अनेक चित्रपटांचे मुहूर्त होत आहेत. यंदाच्या वर्षी निवडणुका असल्याने त्याचे प्रमाण काहीसे कमी असले तरी अनेक बडय़ा निर्माता-दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांचे मुहूर्त ठरवले आहेत. नववर्षाचा मुहूर्त साधून ‘बुद्धिबळ एक डाव वजीराचा’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार गोसावी हे करणार आहेत. या चित्रपटासाठी अरुण नलावडे व स्वप्नील जाधव या दोन कलाकारांची निवड करण्यात आली असून या चित्रपटाच्या इतर कलाकारांची निवडप्रक्रिया सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला एप्रिल महिन्यात सुरुवात होत आहे. कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘हुतुतू’ या चित्रपटाची पहिली झलक ही गुढीपाडव्याच्या दिवशी दाखवण्यात येणार असून या निमित्ताने खास नववर्षाच्या स्वागताचा खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर दिग्दर्शक संजय जाधव या वर्षी आपला ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ या हिंदी नावाचा मराठी चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटातून स्वप्नील जोशी व सई ताम्हणकर ही यशस्वी जोडी पुन्हा एकदा झळकणार असून त्यांच्याबरोबरच ऊर्मिला कानेटकर व नागेश भोसले हे एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटात समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये व चिन्मय मांडलेकर यांच्याही वेगळय़ा भूमिका पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणपूर्व काम पूर्ण झाले आहे. नव्या वर्षात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे, तर हा चित्रपट दोन ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. ‘आरडीएक्स सिनेमा’निर्मित ‘तिचा उंबरठा’ या चित्रपटाचेही चित्रीकरण नव्या वर्षात सुरू होणार असून या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप घोणशीकर हे करत आहेत. तेजस्वीनी पंडित हिची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अॅक्शन डिरेक्टर रवी दिवाण हे पहिल्यादांच मराठी चित्रपटातली साहसदृश्ये दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, तेजस्वीनी पंडित, ज्योती चांदेकर, हर्षा खंडेपारकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नितीन देसाई यांनी या चित्रपटाचे कलादिग्दर्शन केले आहे. नीलिमा लोणारी दिग्दर्शित ‘साम दाम दंड भेद’ हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होत आहे. तेजस्वीती लोणारी ही अभिनेत्री या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असून या चित्रपटात अलका कुबल-आठल्ये, विनय आपटे, पद्मनाथ भिंड यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेते अनिरुद्ध जातक यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. स्त्रीभ्रूणहत्येसारखा संवेदनशील विषय मांडणारा ‘स्वयंभू प्रॉडक्शन’ निर्मित व चंद्रशेखर सांडवे दिग्दर्शित ‘सामर्थ्य’ हा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. गेली अनेक वर्षे करमणूकविश्वात आपल्या विविध उपक्रमांनी ज्ञात असलेल्या सांडवे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा एका सत्यघटनेवर आधारित असा हा चित्रपट आहे. स्त्रीभ्रूणहत्या व त्यानंतर समाजाच्या एकंदरीत व्यवस्थेची काय प्रतिक्रिया असते, हे या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात अरुण नलावडे, आसावरी जोशी, मिलिंद गवळी, शीतल पाठक, स्वप्नील जाधव, अमिता खोपकर यांच्या भूमिका आहेत. सध्या कोल्हापूरच्या परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. शिवकुमार लाड निर्मित व रामदास फुटाणे दिग्दर्शित ‘सरपंच भगीरथ’ हा सामाजिक चित्रपटही लवकरच प्रदर्शित होत आहे. संभाजी भगत यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली असून या चित्रपटात उपेंद्र लिमये, वीणा जामकर, डॉ. मोहन आगाशे, किशोर कदम, आदींच्या भूमिका आहेत. हा चित्रपट गणेशोत्सवापर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आजच्या विनोदी चित्रपटांच्या लाटेत सामाजिक समतेचा संदेश देणारा हा चित्रपट वैशिष्टय़पूर्ण तर ठरेलच त्याचबरोबर आपली सामाजिक जाणीव जोपासण्याचा मराठी माणसांचा स्वभावही यातून अधोरेखित होणार आहे.
यंदा गुढीपाडव्यापासून काही नव्या मालिका जरी सुरू होणार नसल्या तरी सर्वच मराठी मालिकांमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताचे प्रसंग आणण्यात येणार आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच वाहिन्यांनी आपापल्या परीने काही ना काही कार्यक्रम करायचे ठरवले आहे. ‘ईटीव्ही’ने मराठी करमणूक क्षेत्रातल्या सर्व तारे-ताऱ्यांच्या उपस्थितीत एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यांच्या वाहिनीवरच्या कार्यक्रमांमध्येही हा उत्साह दिसून येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने मात्र यात थोडा पुढाकार घेतला असून त्यांचा आतापर्यंतचा यशस्वी असलेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे नवे व आगळेवेगळे सत्र या गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. आतापर्यंत सौभाग्यवतींचा असलेला हा कार्यक्रम आता वाग्दत्त वधूंचा असणार आहे. लग्न ठरलेल्या या मुलींना आपल्या भावी सासरविषयी, त्या घराविषयी काय वाटते, त्यांच्या मनात काय भावना असतात याचा वेध घेणारा हा कार्यक्रम असणार आहे. या नव्या संकल्पनेमुळे हाही कार्यक्रम यशस्वी होण्याची खात्री वाहिनीला आहे. ‘झी’ वाहिनीवरच्या इतरही मालिकांमध्ये बदल होणार असून त्यात काही मालिकांच्या कथानकात नवी वळणे येणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांची चाहूल
गुढीपाडव्याच्या दिवशी सादर करण्यात येणा-या ‘चैत्रचाहूल’ या कार्यक्रमाचे यंदाचे नववे वर्ष असून या वर्षी रवींद्र नाटय़ मंदिरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ‘निवडक तंबी दुराई’ हा कार्यक्रम सादर केला जाणार असून त्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. या कार्यक्रमात विनय येडेकर, विजय कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, नंदकिशोर चोघुले, माधवी जुवेकर, संपदा जोगळेकर, तन्वी पालव यांचा सहभाग असणार आहे. यंदाच्या रंगारंग कार्यक्रमात अनेक पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. मराठी करमणूक क्षेत्राचा झेंडा आता सातासमुद्रापार जाऊन पोहोचला आहे. लवकरच मराठी चित्रपटांचा एक पुरस्कार सोहळा मलेशियात होत असून या पुरस्कार सोहळ्याच्या स्मृतिचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षातला हा एक महत्त्वाचा पुरस्कार सोहळा ठरणार आहे. मिक्ता पुरस्कार सोहळय़ानंतर मराठी करमणूक विश्वात होणारा हा दुसरा आतंरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा आहे.
मराठी करमणूकविश्वाची ही सुरुवात एका चांगल्या वर्षाची नांदी ठरणार आहे. निवडणुकांनंतरही अनेक महत्त्वाचे चित्रपट येणार असून हे वर्ष मराठीसाठी सकस करमणुकीचे ठरणार आहे.
मराठी नववर्षाच्या आरंभीच मराठीत एका पाठोपाठ एक महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होतायत. ‘कॅम्पस कट्टा’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट येत्या १८ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. देशभर सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांच्या राजकारणाची एक आगळीवेगळी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, शीतल दाभोळकर व नम्रता गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संजय कोलते दिग्दर्शित या चित्रपटात विक्रम गोखले, अरुण नलावडे व मिलिंद शिंदे हे अभिनेतेही चमकणार असून मराठीतला हा एक बिगबजेट चित्रपट आहे.खास तरुणांसाठी असलेला हा चित्रपट या वर्षारंभाची एक मोठी भेट ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काहीसा रखडलेला ‘धमक’ हा मोठा अॅक्शन चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीलाच २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. मराठी चित्रपटात आतापर्यंत न पाहिलेली साहसदृश्ये हे या चित्रपटाचे खास आकर्षण आहे. राजेंद्र बांदिवडेकर दिग्दर्शित या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, गिरिजा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजोबा व नातवाच्या नात्यावर आधारित असलेला एक मोठा चित्रपटही मे महिन्यात प्रदर्शित होत आहे. ‘विटीदांडू’ असे या चित्रपटाचे नाव असून गणेश कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विटीदांडू या काहीशा मागे पडलेल्या खेळाच्या प्रतीकात्मक वापरातून नात्यांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दाखवण्याची आपली इच्छा असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश कदम यांनी म्हटले आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, यतीन कार्येकर यांच्यासह शुभंकर अत्रे यांची विशेष भूमिका आहे. ज्ञानेश्वर मर्गज दिग्दर्शित ‘राजभाषा’ हा चित्रपटही मे महिन्यात प्रदर्शित होत आहे. अनेक भाषांच्या व भावनांच्या लढाईची एक आगळीवेगळी कथा या चित्रपटातून दाखवण्यात येत आहे. खास महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.