उद्धव ठाकरे यांचे विसंगत वक्तव्य
मुंबई – केंद्रातील आणि राज्यातील सरकारमध्ये राहून सरकारवरच टीका करण्याचा चंग बांधलेल्या शिवसेनेने आपण सत्तेतून बाहेर न पडता जम्मू काश्मीरमधून भाजप सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा विसंगत सवाल केला आहे. शिवसेना म्हणते, जम्मू काश्मीरमधील भाजपप्रणीत सरकार काश्मीरमध्ये अतिरेक्यांना मारल्याने लष्करावर गुन्हे दाखल करते. आपल्याच सरकारविरोधात आकांडतांडव करण्याचे नाटकही रचते. हे ढोंग करण्यापेक्षा भाजप सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत राहून पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे.
शिवसेना आपल्या मुखपत्रातून म्हणते की, मेहबुबा मुफ्तींच्या सरकारमध्ये भाजपा सहभागी आहे. अशात मेहबुबा आणि त्या मंडळींनी केंद्र सरकारविरोधात मस्ती सुरू केली आहे. शोपियान जिल्ह्यातील हल्ला प्रकरण हे त्याचे ताजे उदाहरण आहे. संपूर्ण प्रकरणात लष्करावर ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधित मेजर आणि त्यांच्या गस्ती पथकांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश मेहबुबा मुफ्ती यांनी दिले आहेत. या प्रश्नी भाजपने विधानसभेत हंगामा केला.
मेहबुबा सरकारमध्ये ही मंडळी आहेत उपमुख्यमंत्रीपद आणि अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे. पटत नसताना महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या सत्तेत असलेली शिवसेना स्वत: बाहेर न पडता भाजपला बाहेर पडण्याचा देत असलेला सल्ला म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांच्या विसंगत वक्तव्याचे दर्शन होत आहे