मुंबईतील पाणीटंचाई विचारात घेता ज्या जलतरण तलावांना महापालिकेचा पाणीपुरवठा होतो, अशा तलावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते.
मुंबई – मुंबईतील पाणीटंचाई विचारात घेता ज्या जलतरण तलावांना महापालिकेचा पाणीपुरवठा होतो, अशा तलावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात हा केवळ फार्सच असल्याचे उघड होत आहे.
जलतरण तलावांना महापालिकेच्या वतीने एकदाच पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावातील पाण्यावर पुनप्र्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर पुन्हा याच पाण्याचा वापर तलावात केला जातो. त्यामुळे तरण तलावांना महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करण्याचा प्रश्नच उद्भवत नसून, पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देत महापालिका मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेच्या वतीने शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी स्मारक जलतरण तलाव, चेंबूर येथील जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव, कांदिवली पश्चिम येथील सरदार वल्लभभाई जलतरण तलाव, घाटकोपरमधील लायन्स महापालिका जलतरण तलाव चालवले जात आहेत.
[poll id=”717″]
तर गोरेगावमधील महापालिकेचा नेर्लान स्पोर्ट्स ओझोन जलतरण तलाव हा खासगी संस्थेला चालवण्यास दिला आहे. या सर्व तरण तलावांना महापालिकेच्या वतीने पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु
या पाण्याचा वापर केवळ एकदाच केला जातो.
तरण तलावांना वारंवार पाण्याचा पुरवठा केला जातो. पोहण्यास येणा-यांच्या आरोग्याचा विचार करून वापरण्यात येणा-या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते आणि त्यानंतर त्याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात नसल्याने तो खंडित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जलतरण तलावांच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.
शिवाजी पार्क येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय तरण तलाव बनवण्यात आले आहे. या ठिकाणीही एकदाच पाणी पुरवण्यात आले होते. तर गोरेगावमधील नेर्लान स्पोर्ट्स ओझोन तलावाचे पाणी शुद्धीकरण करून वापरले जाते. या ठिकाणी वर्षा जलसंचयन आणि कूपनलिका खोदण्यात आली आहे. या पाण्याचा वापर इतर कामांसाठी केला जातो. त्यामुळे महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात आला नाही, तरी फरक पडत नसल्याचे या तलावाचे व्यवस्थापक सीताराम दळवी यांनी स्पष्ट केले.
महापालिकेचे सहआयुक्त एस. एस. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, जलअभियंता विभागाने नक्की कोणता पाणीपुरवठा खंडित केला जाईल, याची माहिती दिलेली नसल्याचे ते म्हणाले. तरण तलावांमध्ये वारंवार पाणी बदलावे लागत नाही. त्यामुळे तलावांचे पाणी बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे तलावातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्या वेळी काही प्रमाणात पाणी सोडावे लागते. पण, तशी समस्या पावसाळ्यात निर्माण होत नाही. मात्र सध्या तरी पाणीटंचाईमुळे तलाव बंद करण्याच्या सूचना मिळालेल्या नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.