मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतील ९४२ लिपिकपदांसाठी शुक्रवारपासून सुरू झालेली ऑनलाइन परीक्षा आणि टंकलेखनाच्या व्यावसायिक चाचणीला गोंधळाने सुरुवात झाली.
मुंबई – मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतील ९४२ लिपिकपदांसाठी शुक्रवारपासून सुरू झालेली ऑनलाइन परीक्षा आणि टंकलेखनाच्या व्यावसायिक चाचणीला गोंधळाने सुरुवात झाली. मुंबईसह १४ ठिकाणी आणि ५६ केंद्रांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नाला गोंधळाचे गालबोट लागले.
मुंबईतील दादर, कांदिवली, अंधेरी आणि ठाणे, घोडबंदर आदी केंद्रांमध्ये पहिल्या तुकडीतील उमेदवारांची परीक्षा सुरू असतानाच सव्र्हरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे शेकडो उमेदवारांना परीक्षा न देता माघारी फिरावे लागले. दरम्यान, अशा उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, असे उपायुक्त (सामान्य प्रशासन) किरण आचरेकर यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या विविध विभागांतील ९४२ रिक्तपदांसाठी मागवण्यात आलेल्या अर्जात ७१ हजार ८१६ उमेदवारांनी नावे नोंद केली होती. या सर्व उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा आणि टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी १३ ते १५ जून या कालावधीत होणार होती. उमेदवारांच्या सोयीसाठी ही परीक्षा एकाच वेळी राज्यातील १४ जिल्ह्यांत घेण्यात येत आहे. ही परीक्षा काही केंद्रांवर तीन दिवस तर काही केंद्रांवर एक दिवस होणार होती.
त्यानुसार या परीक्षेला सर्व केंद्रांवर शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. परंतु दादर पूर्व येथील राजा शिवाजी विद्यासंकुल, कांदिवली पूर्व येथील ठाकूर महाविद्यालय, अंधेरी पश्चिम येथील ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, अंधेरी पूर्व येथील फायरबेली प्रॉपर्टीज, ठाण्यातील एमबीसी स्पेस आदी ठिकाणच्या केंद्रावर सकाळपासूनच गोंधळ निर्माण झाला.
पहिल्या तुकडीतील विद्यार्थी टंकलेखनाची मराठी चाचणी देत असतानाच सव्र्हरमध्ये बिघाड झाला. मात्र यानंतर येथील संस्थेच्या अधिका-यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे उमेदवार अस्वस्थ झाले. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याचाच फटका दुस-या तुकडीतील विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे याठिकाणी अचानक मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
मुंबई आणि ठाण्यातील काही केंद्रांमधील गोंधळ वगळता अन्य जिल्ह्यांमधील केंद्रांमध्ये ही परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र, ज्या उमेदवारांना सव्र्हरमधील बिघाडामुळे परीक्षा देता आली नाही अशा उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचा कालावधी १५ जूनपर्यंत आहे. त्यामुळे परीक्षेचा अहवाल संबंधित संस्थेकडून मागवण्यात येणार आहे. याबाबत संबंधित उमेदवारांना माहिती देण्यात येणार असल्याचेही उपायुक्त किरण आचरेकर यांनी स्पष्ट केले.