शीव येथून भंगार व्यापा-याचे अपहरण करून ३१ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्रिकुटाला अटक केली आहे.
मुंबई – शीव येथून भंगार व्यापा-याचे अपहरण करून ३१ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्रिकुटाला अटक केली आहे. मात्र या व्यापा-याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नसून चौकशीत त्याची हत्या झाल्याची कबुली आरोपींनी दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
स्वामी नारायण सालवानी (६५) असे या व्यापा-याचे नाव असून तो शीव येथील रहिवासी आहे. तो तीन जूनपासून गायब झाल्याची नोंद पोलिसांत होती. बेपपत्ता होण्यापूर्वी तो दोन अनोळखी व्यक्तींसोबत दिसला होता. दोन दिवसानंतर तो गायब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सालवानी यांच्या कुटुंबीयांना पैशाची मागणी करणारे फोन येत होते. मात्र त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले.
पण आरोपी ३० लाखांची मागणी करू लागल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी येणा-या फोनची माहिती घेतली. ते माटुंगा व शीव परिसरातून केल्याचे पुढे आले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत होती.
त्यानंतर बुधवारी बदलापूर येथील वांगणी परिसरातून विशाल दुधाडे, अबीद महाबले व मिथुन पिल्लई यांना अटक केली. त्या चौकशीत त्यांनी व्यापा-याचे अपहरण केल्याचे मान्य केले. आणखी एक आरोपी अन्वर सिद्धीकी याचा पोलिस शोध घेत आहे. चौकशीत सालवानीची अपहरण गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे.
त्यांचा मृतदेह माळशेज घाटातून खाली फेकून दिल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तेथे रवाना झाले असून शोधमोहिमेत अद्याप सालवानी यांचा मृतदेह सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.