शिवसेनेची व्होटबँक असलेला मुंबईसह राज्यातील कोळी समाज आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री लागले आहेत.
मुंबई – शिवसेनेची व्होटबँक असलेला मुंबईसह राज्यातील कोळी समाज आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री लागले आहेत. यानुसार कोळी समाजानेच कोळीवाडे विकसित करावेत, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच याचा विशेष उल्लेख विकास आराखडय़ात करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
वर्सोव्यातील मेट्रो स्थानकाच्या जवळील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या वर्सोवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहेत. त्यामुळे ते विकसित झाले पाहिजेत आणि ते कोळी समाजालाच विकसित करता आले पाहिजेत, असा विशेष उल्लेख मुंबईच्या विकास आराखडय़ात करण्याचा निर्णय घेऊन तसे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेला चिमटे,निवडणुकीचे राजकारण
कोळी समाजाला कोणीही मुंबईतून हद्दपार करू शकणार नाही. कोळी समाज टिकला तर मुंबईचे अस्तित्व टिकेल, असे चिमटेही मुख्यमंत्र्यांनी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला काढले आहेत. मुंबईच्या विकास आराखडय़ात कोळीवाडे हद्दपार होत असल्याचा कांगावा केला जात असताना त्याला शिवसेनेकडून बळ देण्याचे प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे चिमटे काढले आहेत.
पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागाप्रमाणे ‘माधव’ हा पॅटर्न मुंबई महापालिका परिसरात राबवणे अशक्य आहे. याला कारण आहे कॉस्मोपॉलिटिन असलेल्या मुंबईतील कोळी समाज ही व्होटबँक गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडे वळल्याने अटीतटीच्या प्रसंगात हा समाज शिवसेनेच्या मदतीला येतो. हा आतापर्यंतचा राजकीय इतिहास आहे. येणा-या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सातवे अस्मान दाखवण्यासाठी मुंबईतील सर्वच समाजाला बरोबर घेऊन जाण्याशिवाय गत्यंतर नाही. याचे ‘बौद्धिक’ मिळालेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यामुळेच या महोत्सवाला वेळेत वेळ काढून हजेरी लावली. तसेच कोळी समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भाजपाची ही खेळी शिवसेनेला किती पचनी पडते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.