मोटारसायकलस्वाराला रिक्षाची धडक बसल्याचा जाब विचारल्याच्या रागातून रिक्षाचालकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार परिसरात घडला.
विरार- मोटारसायकलस्वाराला रिक्षाची धडक बसल्याचा जाब विचारल्याच्या रागातून रिक्षाचालकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार परिसरात घडला. या घटनेनंतर रिक्षाचालकाची गुंडगिरी थोपवण्यापेक्षा काही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी या प्रकरणात हस्तक्षेप करून रिक्षाचालकालाच मदत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाईंदर पश्चिमेकडील भाईंदर गाव म्हणून ओळखल्या जाणा-यां भागातील पिढीजात राहणा-यां म्हात्रे कुटुंबातील सदस्य मेघन म्हात्रे स्टेशनकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या रिक्षाची मोटारसायकलीला ठोकर बसली. म्हात्रे यांनी याचा जाब त्याला जाब विचारताच भडकलेल्या रिक्षाचालकाने म्हात्रे यांना मारहाण केली. त्यावेळी घाबरलेल्या म्हात्रे यांनी आपले मित्र विलास पाटील यांना मदतीसाठी बोलावले, त्यांच्याबरोबर सुरेश भंडारी व ललित जोशीही आले होते. या तिघांना रिक्षाचालकाच्या १० ते १२ साथीदारांनी बेदम मारहाण केली. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता म्हात्रे यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिरंगाई केली.
चिडलेल्या स्थानिक रहिवाशांनी पोलिस ठाण्याजवळ गर्दी केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. त्यात काही राजकीय नेत्यानी रिक्षावाल्याच्या मदतीसाठी पोलिसांवर दबाव टाकल्याने तणावात आणखीनच भर पडली. या प्रकरणी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांच्याशी संपर्क साधता त्यांनी रिक्षा ताब्यात घेतली असून रिक्षाचालकाचा शोध सुरू असल्याचे सांगितले.