लिहिणं ही माझी आंतरिक गरज आहे. जे काही चांगलं आहे ते मला लोकांबरोबर वाटून घ्यायला आवडतं. लोकांबरोबर सहभागी व्हायला आवडतं. लोकांबरोबरचा संवाद मला महत्त्वाचा वाटतो. म्हणून मी लिहितो, असं मानणारे कवी, लेखक, चोखंदळ वाचक, लघुनियतकालिक चळवळीतील एक महत्त्वाचे शिलेदार, मित्रांचा आणि पुस्तकांचा आधारस्तंभ, वाचणा-या अधिक प्रोत्साहित करणारे आणि लिहिणा-याला लेखक बनवणारे ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. वाचक हा लेखकाइतकाच सृजनशील असतो. वाचनसंस्कृती टिकण्यासाठी लेखक आणि वाचक हे दोन्ही घटक त्यांना महत्त्वाचे वाटतात. या सर्व पार्श्वभूमीवर, मराठी साहित्यविश्वाला नवं वळण लावणारं साठोत्तरी साहित्य, लघुनियतकालिकांची चळवळ तसेच ‘वाचणा-याची रोजनिशी’ या त्यांच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास या अखंड वाचणा-या लेखकाकडूनच जाणून घेतला.
तुमच्या जडण-घडणीविषयी सांगाल?
माझा जन्म मालवण तालुक्यात वेंगुर्ल्यातील काळसे गावात झाला. पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालं. आठवीपासूनची व्यवस्था गावात नसल्यामुळे मी मुंबईत आलो. मुंबईत रात्रशाळेत आठवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, आई-बाबा गावी असल्यामुळे, माझं कुटुंब गावी असल्यामुळे मी पुन्हा गावी परतलो. पुन्हा नववी ते मॅट्रिकपर्यंतचे (जुने अकरावीपर्यंतचं) शिक्षण वालावल येथे झालं. एक नदी आणि मळा पार केल्यानंतर आमची शाळा होती. त्यानंतर पुन्हा मुंबईला आलो. त्यावेळी गिरगावला विल्सनच्या पाठीमागे भवन्स महाविद्यालय होतं. तिथं प्रवेश घेतला. मुंबईत आत्या, मावशी, मामा अशा अनेक नातेवाइकांकडे राहून मी माझं बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मला विज्ञानात रुची होती. पण आर्थिक स्थिती प्रतिकूल असल्याने मी कला शाखेकडे वळलो. त्यातही सुरुवातीला गणित हा विषय घेतला. त्याकाळी बीएला विशेष विषय म्हणून गणित घेता येत होतं. मला अंकगणित आवडायचं. गणितात मी हुशार होतो. त्यामुळे मी पहिल्यांदा गणित हा विषय घेतला. मात्र, गणिताचा तास हा साडेदहाला सुरू होत असे. त्या दरम्यान मी काही काळ ‘ज्ञानदूत’ या मासिकात काम केलं तर नंतर मी ‘नोगी अँड कंपनी’त कामाला लागलो. तिथे कामावर उशिरा येणं खपत नसे. त्यावेळी पोटापाण्याला प्राधान्य दिलं आणि गणित विषय वगळून मी संस्कृत आणि मराठी विषय घेतला. ते विषय साडेदहाच्या आत शिकवले जात होते. त्यामुळे सकाळी कॉलेज आणि दुपारी नोकरी असं करत बीए पूर्ण केलं. गिरगावच्या श्रीकृष्ण बोर्डिगमध्ये मी एक वेळ रात्री जेवायचो. दुपारी गिरगावच्या याजदानीमध्ये दुकानात चार आण्याची नानकटाई खात असे. त्यांना माझी आर्थिक परिस्थिती माहीत होती. त्यामुळे त्यातील कर्मचारीवर्ग माझ्या जेवणाची विशेष काळजी घेत असे. रविवारी होणारं खास खाद्यपदार्थ मला थोडं जास्त प्रमाणात मिळतील, याची ते पुरेपूर काळजी घेत असत. बीए पूर्ण केल्यानंतर एमए करण्यासाठी प्रवेश अर्ज भरला. मात्र एमए पूर्ण करता आलं नाही.
आयुष्यात स्थिरता कधी आली?
बीए पूर्ण झाल्या झाल्या गोगटे आणि नार्वेकर या मित्रांच्या ओळखीने प्रथम महिंद्रा अँड महिंद्रामध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये १९६४ ते १९६६पर्यंत वितरण विभागात काम केलं. १९६५मध्ये वयाच्या २२व्या वर्षी लग्न केलं. पत्नी सरकारी नोकरीत होती. अबकारी कर विभागातून नंतर तिने रेशनिंग विभागात बदली करून घेतली. १९६६मध्येच बँक ऑफ बडोदात नोकरीला लागलो. लग्नानंतर काही महिने कुल्र्यातील बैलबाजार परिसरातील कराची सोसायटीत राहिलो. त्यानंतर डोंबिवलीत विष्णुनगर येथे तीन वर्षे राहिलो. १९७०मध्ये बँकेच्या वसाहतीत विलेपाल्र्याला जागा मिळाली आणि आम्ही १९७० पासून २०००पर्यंत राहिलो. सध्या पेणमध्ये कलावंतांसाठी असलेल्या चित्रकुटीर या वसाहतीत गेल्या १२ वर्षापासून राहतोय.
पुस्तकांशी मैत्री कशी झाली?
पुस्तकांनी मित्र दिले आणि मित्रांनी पुस्तकं दिली. माझी सगळी पुस्तकं आता पेणमध्ये हलवली आहेत. माझ्याकडे एकाच वेळी १०-१२ मित्र येत-जात असतात. तिथे मित्र आणि पुस्तकांनाही भरपूर जागा मिळाली. मात्र आता पुस्तकांची संख्या इतकी वाढली आहे की, तिथं जागा कमी पडू लागली आहे. बँकेत असताना पगार होणार आहे म्हणून आधीच पैसे खर्च करून वेडय़ासारखी पुस्तकं खरेदी केली जायची तर काही वेळा पगार झाला आहे, हे निमित्त पुढे करून पुस्तकं घेतली जायची. स्ट्रँड, बॉम्बे बुक हाउस, मॅजेस्टिक यांनी आमच्या आवडीची पुस्तकं आम्हाला हवी तेव्हा घेऊ दिली. आमची आवड-निवड जपली. प्रत्येक मित्राकडं कोणतं ना कोणतं पुस्तकं असायचं. तेही वाचलं जायचं. मुळात सगळेच मित्र चांगले वाचणारे होते. त्यांनाही वाचनाचं व्यसन होतं. त्यामुळे वाचन वाढत गेलं तसे मित्रही वाढत गेले. पुस्तकांमुळे मला नेमाडे, भाऊ पाध्ये, सुरेश कदम, चित्रे, ढसाळ यांच्यासारखे मित्र भेटले. पुस्तकांचे उपकार मी या जन्मात तरी विसरू शकत नाही.
लघुनियतकालिकांच्या चळवळीशी तुमचा संबंध कसा आला?
१९६०च्या सुमाराला जगभरात सामाजिक, राजकीय आणि साहित्यिकदृष्टय़ाही मोठय़ा प्रमाणात संक्रमण घडून येत होतं. भारतातही हा काळ संक्रमणाचा होता. सगळय़ाच प्रकारच्या घुसळणीचा होता. बीएचं शिक्षण घेत असतानाच मी सगळय़ा प्रकारच्या चळवळींशी जोडला गेला, त्या जवळून पाहिल्या. कामगारांचा संप, विद्यार्थी चळवळी, युक्रांत, राष्ट्रीय सेवा दल, डावी चळवळ असं सगळीकडं काही ना काही घडत होतं. त्यावेळी आमचे आदर्श डांगे होते. तारा रेड्डी आणि जी. ए. रेड्डी यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. याच दरम्यान मी डाव्या चळवळीत अधिक सक्रिय झालो. मी अधिक जवळ गेलो. माझ्या मते, डावी चळवळ म्हणजे स्थूलमानाने आहे त्यापेक्षा चांगली परिस्थिती यावी म्हणून प्रयत्न करणं होय. त्या वेळी दादरमध्ये कित्ते भंडारी हॉलच्या समोर जागृती मंडळ होते. हे मंडळ शशी प्रधान चालवत असे. तो आमच्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं सीनिअर असलेला मित्र. तो त्या वेळी ‘मराठा’मध्ये कामाला होता. तो ‘भारुड’ आणि ‘आरंभ’ असे अनियतकालिक काढत असे. या मंडळाच्या माध्यमातून अशोक शहाणे यांची व्याख्यानंही आयोजित केली जात असत. शशी ‘मराठा’त असल्यामुळे आमचाही ‘मराठा’शी संबंध आला. मराठात आम्ही बारीकसारीक लिहायचो. त्यावेळी शिरीष पै यांच्याशी आमची ओळख झाली. त्यांनी मला लिखाणाबाबत नेहमीच मार्गदर्शन केले. जागृती मंडळामुळेच अरुण खोपकर, श्याम मोकाशी, प्र. श्री. नेरूरकर, राजा ढाले, बाबुराव बागुल, वसंत
भुजबळ, नीला भागवत ही मित्रमंडळी भेटली.
तो काळ चळवळींचा काळ होता. साहित्यातही प्रस्थापित साहित्याविरोधात बंड सुरू होतं, उलथापालथ सुरू होती. आम्ही सगळे निम्न मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेली मुलं होतो. ‘अभिनव’ प्रकाशनचे वामन विष्णू भट, दया पवार, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर, नेमाडे, वामन होवाळ अगदी सगळेच जण. आमच्यामध्ये बंधुभाव जबरदस्त होता. प्रस्थापित साहित्य व्यवहाराला आमचा विरोध होता. कोणालाही आर्थिक स्थैर्य नव्हतं. मात्र नवं काही तरी करण्याची जबरदस्त इच्छा होती. आर्थिक परिस्थिती नव्हती तरीही विरोध तर करायचाच होता. मग आम्ही आमच्या पद्धतीनं नवनवीन प्रकारे ही चळवळ चालवली. भाऊ समर्थ हा त्यावेळचा भारतातील मोठा चित्रकार होता. त्यांचं बंडखोर आत्मनिवेदन आम्ही ‘शब्द’मधून प्रकाशित केलं. सायक्लोस्टोनचा वापर करून (चक्रमुद्रित) पोस्टकार्ड, रद्दीपेपर आणि कागदाच्या तुकडय़ांवरही कविता प्रकाशित करणं सुरू केलं. कोणालाही न दुखावता काही ना काही उचापती करणं, हा आमच्यातील सर्वाचा अंगभूत गुण होता. त्यामागे आपल्याकडे काही ना काही करून लक्ष वेधून घेणं, हाही एक उद्देश होता. त्यासाठी दादरच्या स्मशानात चित्रं लावली. बस, रेल्वेत कविता वाचल्या जाऊ लागल्या. कामाठीपु-यात गांडू बगीचात कविता वाचन केलं. १९७०च्या सुमाराला तर ‘सत्यकथे’चा अंकही आम्ही होळीला दोन-तीन दिवस असताना जाळला. १९६० ते १९७० हा काळ असाच घडामोडींनी भरलेला होता. प्रत्येक प्रस्थापित साहित्य व्यवहार मोडून काढण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यातूनच ही चळवळ फोफावली.
१९७०च्या सुमाराला लघुनियतकालिकांचं दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील एक संमेलन झालं. त्याला देशभरातील लघुनियतकालिक चळवळीतील साहित्यिक कार्यकर्ते उपस्थित होते. आंध्रमधील दिगंबर कवलू, पंजाबी, हिंदी सगळय़ाच राज्यांतील लघुनियतकालिकांच्या माध्यमातून काम करणारे एकत्र आलो होतो. हिंदीमध्ये ‘पहल’ नावाचं नियतकालिक सुरू होतं. ते आजही सुरू असून आता ते त्रमासिक म्हणून प्रकाशित होतं. बंगालमध्ये त्यावेळी ‘भुकी पिढी’(हंग्री जनरेशन) तर इंग्रजीमध्ये ‘डॅम इट’ ही चळवळ होती. या संमेलनात भारतीय पुस्तकांचं प्रदर्शन आणि बदलत्या साहित्य व्यवहारावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जगभरच लघुनियतकालिकांची चळवळ सुरू होती. विद्यार्थी, कामगार, साहित्यिक सगळेच संघर्ष करत होते.
लघुनियकालिकांची नावं, आकार आणि मांडणीतूनही हे बंड दिसून येत होतं?
हो. अगदी लेखनाच्या फॉर्मसह नियतकालिकांची नावं, आकार आणि मांडणीतून प्रस्थापितांना धक्का देण्याचं तंत्र आम्ही अवलंबलं होतं. मुंबईसह महाराष्ट्रभरातून १९६० ते १९७५पर्यंत ५०-६० लघुनियतकालिकं प्रकाशित होत होती. मात्र त्यानंतर लघुनियतकालिकांची संख्या कमी होत गेली. १९५५मध्ये ‘शब्द’ हे पहिलं लघुनियतकालिक निघालं. त्याचं संपादन रमेश समर्थ, अशोक शहाणे, दि. पु. चित्रे करत असत. असो, दिशा, वाचा, नवे लेखन, रंग, आता, येरु, भारुड, हेमा, विद्रोह, चक्रवर्ती, कावळा, अथर्व, अक्षरे, श्रीशब्द, टिंब, तापसी, अबकडई, समूह, फक्त, ललित रंग, स.न.वि.वि., शब्दकार, ऐसाजे, शून्य, अर्णव, अर्णव-तरंग, पाणंद, त्रिशंकू, रावा, लव्हर, लृ, समग्र, विविधा, गारुडी, दिंडी, प्रयोजन, क्षितीज, शब्दांगार, आदिम, कविता, आस्था, अजिंक्य, अक्षरछाया, साहित्यसंवाद, ब्र, धूमकेतू, उद्गार, झौझंझ:, संवाद इत्यादी अनेक लघुनियतकालिकं निघाली. १९७५-८०नंतर अक्षरचळवळ, शब्दवेध, दृष्टी, रेखाटन, ओवी, अभिधा, दखल, दर्शन, खेळ, अनाघ्रात, अभिधानंतर अशी काही लघुनियतकालिकं आजही प्रकाशित होत आहेत.
यातील काही लघुनियतकालिकं मुद्रित तर काही चक्रमुद्रित होती. या लघुनियतकालिकांचे आकारही वेगवेगळे होते. शब्दकार, स.न.वि.वि.सारखी लघुनियतकालिकं अंतर्देशीय पत्रावर छापलेली होती तर ‘लव्हर’ हे लघुनियतकालिक पोस्टकार्डवर छापलं जात होतं. बरीच लघुनियतकालिकं हस्ताक्षरात चक्रमुद्रांकित केलेली आहेत. काही लघुनियतकालिकांचं प्रकाशन निव्वळ एखादाच अंक प्रसिद्ध होऊन थांबलं. या लघुनियतकालिकांमध्ये ‘चक्रवर्ती’ हे एकमेव दैनिक आम्ही काढलं. ‘चक्रवर्ती’चे सलग १२ अंक निघाले तर बहुतेक लघुनियतकालिकं ५-६ अंकांच्या प्रकाशनानंतर बंद पडली आणि तो प्रकार कादंबरी, कविता या सगळय़ा प्रकारांमध्ये दिसून आला.
नेमाडेंनी साहित्यात देशीयवाद, वास्तववाद आणला. भाऊ, चित्रे, कोलटकर यांनी तो जपला आणि वाढवला. ज्या विषयावर फक्त गर्भित अशा कविता केल्या जात होत्या, ते सर्व विषय पद्याऐवजी गद्यातही-कथा, कादंब-यांमध्ये येऊ लागलं.
मराठी साहित्य अधिक मोकळं आणि बिनधास्त झालं, असं वाटतं का?
मराठी साहित्य जास्त मोकळं झालं. याच वेळी कादंब-यांमध्ये बंडखोरी दिसून येत होती. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ कांदबरीने लेखन, आकृतीबंध (फॉर्म), मांडणी, निवेदन या सगळय़ाच अंगांनी वेगळेपणा आणला. हा वेगळेपणा म्हणजेच बंडखोरी होती. भाऊ पाध्ये, नेमाडे, दि. पु. चित्रे यांनी कथा, कादंब-या आणि कवितांचा आकृतीबंध (रचना, फॉर्म) मोडून स्वत:चा फॉर्म तयार करायला सुरुवात केली होती. प्रस्थापित साहित्य व्यवहाराला जोरदार धक्के बसत होते आणि त्यामुळे प्रवाह बदलत होता. मराठी साहित्याचा प्रवाह बदलला. तोपर्यंत प्रमाणभाषेला महत्त्व होते. मात्र नंतर प्रमाणित भाषेऐवजी जगण्यातील, कष्टक-यांची, सामान्य माणसाची भाषा साहित्यात येऊ लागली. साहित्यात आम्हाला काही ना काही करायचं होतं. आर्थिक परिस्थिती किंवा प्रस्थापितांविरोधात असलेली साधनसामग्री नसतानाही आमच्या पिढीने स्वत:ला सिद्ध केलं. या चळवळीने आम्ही ते फार ठामपणे केलं. प्रस्थापित आपल्या पद्धतीनं काम करत होते आणि आम्ही आमच्या पद्धतीनं काम करत होतो. आमच्या प्रत्येक धक्क्याबरोबर ते बदलत होते आणि त्याबरोबर आम्हीही बदलत होतो. ती एक संक्रमण अवस्था होती. जसे भांडवलदार प्रत्येक क्रांतीबरोबर नवीन नवीन मार्ग शोधून काढत टिकून राहतात तसेच प्रस्थापित साहित्य व्यवहार आणि आमचा संघर्ष होत राहिला. प्रस्थापित प्रकाशन संस्थांनीही नवनवीन मार्ग शोधून काढले. मात्र, दोन्ही बाजूचे साहित्य प्रवाह सुरूच होते. अशोक शहाणे यांनी १९६४ला ‘मनोहर’ मासिकात ‘मराठी वाङ्मयावर क्ष किरण’ नावाचा लेख लिहिला. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तर अशोक शहाणे यांचे हात कलम करा, असं म्हटलं. चित्रे, नेमाडे, श्रीकांत सिनकर यांच्यावरही प्रखर टीका झाली. वसंत गुर्जरांवर खटला भरण्यात आला. मात्र सगळय़ाच प्रस्थापित साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांनी आम्हाला विरोध केला नाही. दुर्गाबाई भागवत, म. वा. धोंड. दा. न. शिखरे हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मौजचे श्री. पु. भागवत, ‘अभिरुची’चे पुरुषोत्तम चित्रे यांनीही नंतर आमच्याशी काही वैरभाव ठेवला नाही. ‘पॉप्युलर’नेही भाऊ पाध्येंचं साहित्य प्रकाशित केलं. आमच्यातील काहींचं म्हणणं असं होतं की, व्यवस्थेला उलथवून टाकायचं असेल तर व्यवस्थेच्या पोटात शिरून व्यवस्थेचा कोथळा काढला पाहिजे. मात्र काही जणांना ते मान्य नव्हतं. व्यवस्थेत शिरल्यानंतर ती व्यक्ती व्यवस्थेचाच एक भाग बनून जाते, असं काहींचं म्हणणं होतं. आमच्यात याबाबत वैचारिक मतभेदही होते. या चळवळीमुळे अधिक वेगळं, आतापर्यंत मनात असलेलं, नाकारलं जाण्याची भीती असलेलं, फॉर्मविरहित साहित्यही प्रकाशित होऊ लागलं. मुळात कष्टकरी समाजाचं, थेट जगण्याशी संबंधित असलेलं साहित्य आणि तसं जीवन जगलेले साहित्यिकही जन्माला येऊ लागले. प्रस्थापित साहित्य व्यवहाराला छेद दिला. प्रस्थापित साहित्य व्यवहाराची दादागिरी मोडीत काढण्यात आली. हे सगळं या लघुनियतकालिकांच्या चळवळीचं यश होय. त्यामुळे मराठी साहित्यात साठापर्यंत एक साहित्यप्रवाह किंवा साहित्य आढळतं आणि साठोत्तरी साहित्य असे दोन भाग ठळकपणे दिसतात.
पण नंतर ही चळवळ थंडावली?
हो! नंतर या चळवळीतील लेखक सामाजिक, राजकीय क्षेत्रात उतरले. तसंच त्यांच्यात या चळवळीबद्दलचे वैचारिक मतभेद सुरू झाले होते. ऊर्जा विभागली गेली. त्यामुळे या चळवळीचा जोर कमी होऊ लागला. राजा ढाले यांनी दलित पँथर सुरू केलं. नामदेवही त्यात होता. नंतर आम्ही पसरत गेलो. तुलसी परब शहाद्याला गेला. भालचंद्र नेमाडे आणि चंद्रकांत पाटील औरंगाबादला गेले. चंद्रकांत खोतांनी ‘अबकडई’ नियतकालिक आणि नंतर त्याच नावाने दिवाळी अंक सुरू केला. लघुनियतकालिकांनी एक वादळ निर्माण केलं होतं. काही साहित्यिकांनी व्यवस्था स्वीकारली आणि ते स्वत:च प्रस्थापित झाले. जे साहित्यभान फक्त साहित्यातून येत होतं ते आता इतर गोष्टींतूनही येऊ लागले. त्यामुळे हळूहळू साहित्यिक ऊर्मी थंडावल्या. त्याचं स्वरूप बदललं. साहित्यातून येणारं समाजभान आता थेट जगण्यातून येऊ लागलं.
आज पाच दशकांहून जास्त काळ नेमाडे, भाऊ पाध्ये, चित्रे, ढसाळ यांचं साहित्य टिकून आहे?
प्रत्येक मोठा लेखक हा वर्तमानकाळाबद्दल लिहिताना काळाच्या संदर्भात आपली अशी काही कालातीत मतं, मुद्दे, समस्या मांडतो. ते भाष्य त्यांच्या साहित्यातून प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचतं आणि ते त्या पिढीसाठीही तंतोतंत लागू पडतं, त्या पिढीला आपलंसं वाटतं. मोठय़ा लेखकांच्या बाबतीत हे घडतंच. नवीन पिढीच्या जगण्याशी त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतो. संत तुकाराम, अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, भाऊ पाध्ये, नेमाडे, चित्रे यासारख्या मोठय़ा लेखकांनी कालातीत साहित्याचा पाया मजबूत केला. त्यामुळेच आजच्या समर खडस याच्यासारख्या लेखकांना ही नवीन पिढी सहज स्वीकारते.
आज तुकारामांना जागतिक पातळीवर मान्यता मिळालेली आहे. आज देशात, परदेशात कबीर, तुकारामांना उचलून धरतात. चंद्रकांत देवताले यांनी तुकारामाच्या साहित्याचा फार सुंदर अनुवाद केला आहे. भारतीय पातळीवर मराठी, हिंदी आणि इतर भाषांमधील संघटित साहित्य पुढे आणण्याचं काम चंद्रकांत पाटील यांनी केलं. भारतीय भाषांना अनुवादाच्या साहाय्यानं केंद्रस्थानी आणण्याचं काम त्यांनी केलं. गजानन माधव मुक्तिबोध या हिंदीतील एक मोठय़ा कवीचं वाक्य मला नेहमीच आवडतं आणि ते प्रेरणादायी वाटतं. ‘इसिलिए की जो है उससे बेहतर चाहिए.’ लघुनियतकालिकांच्या चळवळीमुळे तुकारामांपर्यंत जाता आलं. महात्मा फुले यांचा वारसा आपण आता सांगू शकतो. हिंदी, मराठी साहित्यिक आज तुकारामांचे संदर्भ देतात. कष्टकरी, तळागाळातील लोकांचे साहित्य आज प्रकाशित होत आहे.
तुमची साहित्याबद्दल, लिखाणाबद्दल काय भूमिका आहे?
जगणं आणि लिहिण्यातील अंतर कमी करणं आणि जमलं तर नष्ट करणं आवश्यक आहे. कला आणि जगणं, यातील अंतर नष्ट झालं पाहिजे. पण मग प्रश्न निर्माण होतो की, अशानं साहित्यनिर्मिती होईल? तर होईल. ते गातील, बोलतील. ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या जगण्यातून कलेचा आविष्कार करत राहतील. ते आपले नवनवीन कलाविष्कार शोधून काढतील. जगणं आणि लिहिणं यात अंतर असता कामा नये, हीच माझी भूमिका आहे.
‘वाचणा-याची रोजनिशी’ हा लेखसंग्रह कसा घडत गेला? आता हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर कसं वाटतं?
लोकांशी बोलणं, त्यांच्याशी साहित्याच्या माध्यमातून संवाद साधणं, ही माझी आंतरिक गरज आहे. काही गोष्टींची मला देवाण-घेवाण करायला आवडतं. लोकांबरोबरचा संवाद मला महत्त्वाचा वाटतो. त्यातूनच लेखन सुरू असतं. ‘वाचणा-यांची रोजनिशी’ हा संवाद अधिक ठळकपणे आला आहे. कोणतीही भाषा ही संवादात्मक असते. यातीलही भाषा अधिक संवादात्मक आहे. संवादाच्या पातळीवरील आहे. मला काहीतरी माहीत आहे आणि मी ते वाचकाला सांगत आहे. माझ्यात शिस्तीचा अभाव आहे. मी काही एका विशिष्ट प्रकारे लिहीत नाही. परंतु मी लिहिलेलं सगळय़ांना कळावं, असं मला वाटतं आणि माझ्या सुदैवानं माझं लिखाणही अगदी तसंच होतं. सगळय़ांना कळेल अशा पातळीवर सहजपणं जातं.
गेली अनेक वर्ष मी सतत कुठे ना कुठे लिहीत आलो होतो. त्या सर्व लेखांचा हा एक संग्रह आहे. स्वत:ची आणि इतरांशी असलेला हा संवाद आहे. त्यातूनच वाचणा-यांबद्दल, लिहिणा-यांबद्दल आपुलकीनं लिहीत गेलो आणि मित्रांमुळे हे लिखाण पुस्तकरूपानं येऊ शकलं. पुरस्काराचं म्हणशील तर पुरस्कार मिळेल, याची मला कल्पनाच नव्हती. हे पुस्तक स्पर्धेत आहे, याचीही कल्पना नव्हती. पुरस्कार जाहीर झाल्यावर खरं तर मलाच धक्का बसला. हे पुस्तक म्हणजे कादंबरी, कविता, चरित्र, आत्मकथा अशा नेहमीच्या पठडीतील पुस्तक नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारच्या पुस्तकाचीही पुरस्कारासाठी निवड होऊ शकते, त्याचा विचार केला जाऊ शकतो, हे माझ्या ध्यानीमनी नव्हतं. पण पुरस्कार मिळाल्यानं खूप आनंद झाला. त्याच्या पाठीमागील कारण म्हणजे हे पुस्तक आता इतर भाषांमध्येही भाषांतरित होईल. मराठी व्यतिरिक्त इतर भाषंकांपर्यंत माझं हे लिखाण पोहोचेल. वाचन हे माझं मिशन आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून हे मिशन अधिक विस्तारेल. अन्य भाषक लोकांचं या पुस्तकाकडे लक्ष जाईल. अन्य भाषांमध्ये त्याबद्दल लिहिलं जाईल. यामुळे वाचनसंस्कृतीला एक प्रकारे हातभारच लागेल. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. त्याचबरोबर हे पुस्तक ठरावीक पठडीतील नसल्यामुळे त्याला पुरस्कार मिळाल्यानं आतापर्यंतची लेखनातील चाकोरी मोडली गेली आहे. हे एक शुभदायी लक्षण म्हणावं लागेल. अनेक लोकांचे फोन आले. त्यातील काही माझ्या ओळखीचे होते तर काही अनोळखी होते. काही वाचक होते. एका अनोळखी वाचकानं फोन केला. ‘हा पुरस्कार आमच्या पुस्तकालाच आहे, आम्हालाच आहे’ असं सांगितलं. मला वाटतं माझं मिशन आता अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.
तुमचा प्रवास वाचक, साहित्यिक आणि वाचक असा पुन्हा-पुन्हा होत राहिला आहे. तुम्ही स्वत:मधील लेखक आणि वाचक एकाच वेळी कसा जिवंत ठेवला? लेखक जसा सृजनशील असतो तसा वाचकही असतो का? वाचकही निर्माण व्हावा लागतो का? वाचकच लेखकाला जन्म देतो? तुमच्या दृष्टीनं वाचकाचंही महत्त्व आहे? तुम्ही आताच म्हणालात की, वाचन हे तुमच्यासाठी एक मिशन आहे.
लेखन कोणीही स्वानंदासाठी करत नाही. वाचकांचा प्रतिसाद आवश्यक असतोच. लिहिलेलं साहित्य वाचलं गेलं नाही तर ते लिखाण पूर्णत्वाला गेलं, असं मला वाटत नाही. असं कधीही होत नाही की, लेखक नुसतं काही तरी लिहितो आणि मग तो बासनात गुंडाळून ठेवतो. म्हणून वाचन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वाचक हा जरी लिहीत नसला तरी तो सृजनशीलच असतो. वाचताना तो मनातल्या मनात स्वत:चे अर्थ, जगण्याची उमेद शोधत असतो. वेळ जात नाही म्हणून वाचणारे वाचक सोडले तर सगळेच वाचक हे सृजनशील असतात. मला आतून काही तरी सांगावंसं वाटतं, ते मी लिखाणातून मांडतो आणि माझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं असतं. हे सांगणं जसं महत्त्वाचं असतं तसंच वाचणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून माझ्यातील वाचक जिवंत आहे आणि हा वाचकच लेखकाला जन्म देतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणूनच माझ्यातील वाचक आणि लेखक हा एकाच वेळी जिवंत राहू शकला. आजही मला खूप वाचायला आवडतं. काही अजून वाचायचं शिल्लक आहे.
मोबाइल, नेटच्या, लॅपटॉप आणि सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात साहित्य निर्मिती होत राहील की, फक्त शेअर, लाइक, डिसलाइक होत राहील? ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं निर्मिती प्रक्रिया, सृजनशीलता संपवून टाकतील? तुम्हाला काय वाटतं?
साहित्य निर्मिती होतच राहील. नवीन उपकरणांची अप्रत्यक्षपणे पुस्तकांशी स्पर्धा सुरू असली तरी पुस्तकं शेवटपर्यंत टिकतील. ‘देअर इज नॉट द एंड ऑफ द बुक्स’ या नावाचं एक पुस्तक उंब्रेटो इको आणि जीन क्लोद कॉरिअर यांनी लिहिलेलं आहे. या दोघांचा पुस्तक आणि वाचनसंस्कृतीबद्दलचा संवाद यात आहे. पुस्तकांच्या माध्यमातून वाचक गंध, स्पर्श, मांडणी अनुभवत असतो. हे व्हच्र्युअल जगात शक्य नसतं. एक पान उलटून पुन्हा सहजपणे मागे जाता येत नाही. ६५ आणि १०५ ही दोन्ही पानं एकाच वेळी पाहता येतात. ग्रंथांचा वारसा हा फार जुना आहे. तो असाच कायमस्वरूपी टिकून राहणार आहे. पुस्तकवेडा, ग्रंथवेडा किंवा साधारणपणे एकदा पुस्तक वाचणारी व्यक्ती इतर माध्यमांकडे सहसा वळत नाही. पुस्तकांबद्दल असलेल्या ममत्वामुळे, आपुलकीमुळेच हे शक्य होतं.