शिवसेना आणि मनसेत मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेला वाद ही खासगी बाब असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई – शिवसेना आणि मनसेत मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेला वाद ही खासगी बाब असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यात भाजप पडणार नसल्याचे सांगताना दोघांच्या भानगडीत तिसरा कशाला, असा उलट सवालही त्यांनी केला आहे. प्रदेश भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते
बोलत होते.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना आणि मनसेचे घरातील भांडण रस्त्यावर आले व जोरदार राडा झाला. त्याचे पडसाद राजकीय पटलावरही उमटले. भाजपने मात्र यापासून दूर राहणेच पसंत केले असूून झाला प्रकार ही खासगी बाब असल्याचेही भंडारी म्हणाले. ज्या वेळी दोघांची भांडणे होत असतात त्या वेळी तिस-याने मध्ये पडायचे नसते, असेही भंडारी यांनी स्पष्ट केले. मात्र एनडीए आणि महायुती म्हणून शिवसेनेच्या बाजूने असल्याची सारवासारव करायलाही ते विसरले नाहीत.
या वेळी झालेल्या प्रकाराबद्दल पोलिस यंत्रणेलाही जबाबदार धरण्यात आले. गुजरातच्या मेहसाणा दूधसंघाने राज्याला दुष्काळ काळात केलेली मदत पुन्हा मागितली आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नाला भंडारी यांनी बगल दिली. यावर कागदपत्र गोळा करण्याचे काम सुरू आहे. ती मिळाल्यानंतर या प्रकरणावर बोलू, असे सांगत त्यांनी याविषयी बोलणे टाळले.