बिबटयांचा अधिवास समजल्या जाणा-या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच बिबटयांसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध नसल्याचे एका संशोधनाअंती निदर्शनास आले आहे.
मुंबई- बिबटयांचा अधिवास समजल्या जाणा-या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच बिबटयांसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध नसल्याचे एका संशोधनाअंती निदर्शनास आले आहे. याउलट मात्र उद्यान परिसरातील आरे कॉलनीत बिबटयांना मोठया प्रमाणात खाद्य उपलब्ध होत आहे. वाढत्या कच-यामुळे या परिसरात प्रत्येक एका किलोमीटरला जवळपास ५७ कुत्रे असल्याचे दिसून आले आहे.
‘मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’, वन खाते, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि बंगळूरु येथील सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडिज या संस्थांमार्फत ऑगस्ट २०११ ते ऑगस्ट २०१२ या कालावधीत उद्यानात संशोधन करण्यात आले. या संशोधनात उद्यानाचे तसेच बिबटयांचे संवर्धन, मानव-प्राणी संघर्ष टाळणे व संघर्षाचे दुष्परिणाम कमी करणे या मुद्दयांवर भर देण्यात आला होता.
या संशोधनात उद्यान व आरे कॉलनी परिसरात एकूण २१ बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बिबटयांचे नैसर्गिक खाद्य म्हणून ओळखले जाणारे चितळ, सांबर हे तृणभक्षी प्राणी उद्यानाच्या मध्य, दक्षिण व पश्चिम भागात मुबलक प्रमाणात आहेत. मात्र, जंगली डुकरे, चौसिंगे व भेकर, हरीण यांची संख्या उद्यानात फार कमी आहे.
याबाबत वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांनी सांगितले की, ‘बिबटयांना मानवनिर्मित सीमारेषा समजत नाहीत. त्यामुळे ते उद्यानातच बांधील राहणे शक्य नाही. उद्यानात त्यांना उपलब्ध असलेल्या खाद्याचे प्रमाण उद्यानाबाहेर उपलब्ध खाद्याच्या तुलनेत अपुरे आहे.
मानवी वस्त्यांच्या आसपास कुत्रे, डुकरे, प्राण्यांचे सापळे खूप मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्याने बिबटे तेथे आकर्षित होतात. या संशोधनात आढळलेली दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिबटय़ांचे हल्ले २०११ च्या शेवटी तुंगारेश्वर येथे, जुलै ते ऑगस्ट २०१२ दरम्यान तानसा येथे आणि २०१२ अखेरीस आरे कॉलनी व भांडुप येथे झाले. अलीकडच्या काळातील हे हल्ले विशिष्ट काळी व ठिकाणीच झाले असल्याने ते विशिष्ट बिबटयांनीच केले असल्याचा अंदाज आहे.
रस्त्यांवरील अपघातांत ३५ बिबटयांचा मृत्यू
उद्यानाच्या उत्तरेकडील रस्त्यांवर झालेल्या अपघातांत १९९४ पासून सुमारे ३५ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. बिबटे महामार्ग ओलांडतात तसेच नागला ब्लॉकच्या व उत्तरेकडील जंगलाकडे जाण्यासाठी उल्हास खाडी पोहून पार करतात. त्यांच्या या प्रवासादरम्यान वाहनांनी त्यांना धडक दिल्याने अपघात होत असल्याचे या संशोधनात निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईकर्स फॉर एसजीएनपीने वाहनांची जास्त वर्दळ असलेल्या भागांत गतिरोधक बसवण्याची सूचना केली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे वेगळे झालेले जंगलाचे भाग जोडण्यासाठी रस्त्याखालून मार्ग बांधावेत, जेणेकरून वन्यप्राणी जंगलांत व हरित भागांत मुक्तपणे वावरू शकतील.